पुस्तकाची अशीही कुंडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 11:24 IST2025-06-08T11:24:10+5:302025-06-08T11:24:41+5:30

प्रकाशनासाठी पुस्तक निवडीत सुरुवातीपासून पॉप्युलरने प्राध्यापक वा.ल. कुळकर्णी आणि श्री.पु. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नवसाहित्याचा मार्ग स्वीकारला. तरीही खरा शोध हा उत्तम साहित्याचा होता. लेखकाची किंवा लेखिकेची जात, धर्म, वय, गाव यांचा विचार कधी पॉप्युलरने केला नाही.

The horoscope of the book is also like this... | पुस्तकाची अशीही कुंडली...

पुस्तकाची अशीही कुंडली...

-रामदास भटकळ
प्रकाशनासाठी पुस्तक निवडीत सुरुवातीपासून पॉप्युलरने प्राध्यापक वा.ल. कुळकर्णी आणि श्री.पु. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नवसाहित्याचा मार्ग स्वीकारला. तरीही खरा शोध हा उत्तम साहित्याचा होता. लेखकाची किंवा लेखिकेची जात, धर्म, वय, गाव यांचा विचार कधी पॉप्युलरने केला नाही. गाडगीळ, गोखले, पाडगावकर यांच्याप्रमाणे कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, प्रभाकर पाध्ये असे काही ज्येष्ठ लेखकही पॉप्युलरच्या यादीत विराजमान झाले.

पुस्तक निर्मितीच्या क्षेत्रात विष्णुपंत भागवत, सोन्याबापू ढवळे असे मुद्रकही होते. त्यांचा अनुभव आणि त्यांची मते याचाही प्रभाव पडायचा. त्याचप्रमाणे इतर रसिकांशीही आम्ही संपर्क ठेवला. अशा साहित्यप्रेमींमध्ये एक ज्येष्ठ प्रकाशक हरिभाऊ मोटे हेही होते. त्यानंतर १९५०च्या सुमारास चिंतामणराव कोल्हटकर यांच्या ‘बहुरूपी’ पासून ते पुन्हा पुस्तक प्रकाशन क्षेत्रात उतरले असले तरी त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव होती. त्यांना खास जवळची वाटणारी पुस्तके ह.वि. मोटे प्रकाशन म्हणून पॉप्युलरच्या मदतीने प्रसिद्ध होत असली तरी ते काही वेगळ्या बाजाच्या साहित्याकडे आमचे लक्ष वेधत असत.

राजा बढे हे काही पु. शि. रेगे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, सदानंद रेगे यांसारखे नवकवी म्हणून गाजलेले नव्हते. परंतु  ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सारखे महाराष्ट्र गीत, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘हसले मनी चांदण’, ‘माझिया माहेरा जा’ सारखीसारखी भावगीते आणि ‘मोहनिया तुज संगे नयन खेळले जुगार’ सारखे गझल यांमुळे कविवर्य म्हणून ते ओळखले जात. ते प्रेमाचे रंग शोधणारे प्रेमकवी म्हणायला हरकत नाही. संस्कृत आणि मराठी कवितेचा त्यांचा व्यासंग फार मोठा होता. त्यांनी शेफालिका (गाथा सप्तशती), छंदमेघ (मेघदूत), श्रृंगार श्रीरंग (गीतगोविंद) काव्य मराठीत आणली.

राजा बढे यांनी कविता तत्कालीन काव्यप्रवाहापासून वेगळी असली तरी तिचा मोह, विशेषतः माझ्यासारख्या तेव्हा तरुण वयाच्या वाचकाला पडणे साहजिकच होते. नाहीतरी एकाच प्रकारची कविता किंवा लघुकथा हे श्रेष्ठ साहित्य आम्हाला मान्य नव्हते. राजा बढे यांची प्रेमकविता तितक्याच महत्त्वाची आहे, याचा अंदाज आम्हाला होता. हरिभाऊ मोटे, द.ग. गोडसे अशा मित्रमंडळींमुळे राजभाऊंचा परिचय झाला. त्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्षांत लिहिलेल्या कवितांतून गझल आणि त्यात प्रकट होणाऱ्या भावभावनांसह इतर कवितांचा संग्रह प्रसिद्ध करावा अशी इच्छा होती. तोवरप्रामुख्याने त्यांच्या ‘माझिया माहेरा’ सारख्या लोकप्रिय भावगीतांची पुस्तके फक्त प्रसिद्ध झाली होती.

गझल हा आज लोकप्रिय झालेला उर्दू आणि मराठी काव्यप्रकार त्यावेळी मराठी रसिकांमध्ये रुळला नव्हता. तेव्हा गझल, कव्वाली हे काव्यप्रकार काहीसे हिणकस वाटत असत. बेगम अख्तर सारख्या श्रेष्ठ कलावंतांनी ज्या प्रकारे गझल हा काव्यप्रकार गाऊन लोकप्रिय केला. त्यामुळे रामुभैय्या दाते यांच्यासारखे रसिकाग्रणी या काव्यप्रकारावर भाळले. मराठीत राजा बढे यांनी प्रेमकवितेत डुंबून गझलेसारख्या श्रृंगारिक भाववृत्ती यांना कलात्मक रूप दिले होते तेही भावगीतांसारख्या सर्वप्रिय माध्यमातून.

हरिभाऊंचे खास स्नेही रामुभैय्या दाते यांची प्रस्तावना या पुस्तकाला असावी असे स्वतः कवी राजा बढे, हरिभाऊ मोटे आणि मलाही वाटू लागले. रामूभैया आजारी होते. तरीही उर्दूतील प्रेमकाव्यापेक्षाही सरस अशी राजाभाऊंच्या प्रेमकवितांची मोहिनी त्यांनाही जाणवत असल्याने त्यांनी प्रस्तावना लिहायचे कबूल केले. त्यांचा आजार, राजाभाऊंची निःसंग वृत्ती आणि प्रकाशकाची गजगती यामुळे पुस्तकाच्या प्रकाशनाला बराच वेळ लागला आणि १९७६ साली पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा प्रस्तावनाकार जगातून निघून गेले होते.

प्रस्तावनेत त्यांनी स्पष्ट लिहिले होते की गझल म्हणजे प्रेमकाव्य किंवा प्रणयगीत. केशवसुतांनी फार पूर्वी ‘झपूर्झा’ कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘मखमालीची लव वठली’ या प्रकारची धुंदी रामुभैया यांना राजा बढे यांच्या कवितांमुळे दिली. हाच अनुभव रसिकांना येईल या विश्वासाने ही काहीशी वेगळी कविता आम्ही प्रकाशित केली.

Web Title: The horoscope of the book is also like this...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.