राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 05:50 IST2019-04-23T05:49:44+5:302019-04-23T05:50:00+5:30
पाच मृत्यू मुंबईतील

राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी
मुंबई : वातावरणात बदल होत असल्याने राज्यात स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. जानेवारी ते एप्रिल यादरम्यान राज्यभरात स्वाइन फ्लूमुळे एकूण १२० जणांचा बळी गेला आहे. याखेरीज, राज्यात सध्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील चार रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर राज्यात १ हजार ३४६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आहेत. आॅसेलटॅमिवीर या गोळ्या देण्यात आलेल्या संशयित फ्लू रुग्णांची संख्या १५ हजार ५२४ एवढी आहे. बळी गेलेल्यांमध्ये मुंबईतील पाच रुग्णांचा समावेश आहे.
राज्यात सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले असून ही संख्या २५ एवढी आहे. मागील काही दिवसांमध्ये उन्हाचा चढणारा पारा आणि रात्रीचा थंडावा अशा दुहेरी वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा जोर राज्यात वाढल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
नाशिकनंतर नागपूरमध्ये १६ तर अहमदनगरमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. गेल्या वर्षी राज्यात स्वाइन फ्लूमुळे ४६१ बळी गेले होते, तर रुग्णांची संख्या २ हजार ५९३ एवढी होती.