महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:43 IST2025-09-30T17:42:43+5:302025-09-30T17:43:50+5:30
पंतप्रधान मोदी देशाची प्रतिष्ठा जपत नाहीत, असाही केला आरोप

महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडली हे सर्वांना माहित आहे, पण बदनामी मात्र महात्मा गांधींची करण्यात आली. परंतु आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण गेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, असा खोचक टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. संविधान सत्याग्रह पदयात्रेत ते बोलत होते.
या पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर गांधी यांचे पणतू तुषार गांधीही सहभागी होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले, "खोटे बोलून आज भाजपा सत्तेत आला आहे. पण महात्मा गांधी नावाचा संत भाजपा व संघाच्या मानगुटीवर बसलेला आहे. संघाच्या १००व्या वर्षी सुवर्णयोग आलेला असून भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार संघाने स्विकारावे असे आवाहन काँग्रेसने केले आहे. पण रा. स्व. संघाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे," अशी टीका त्यांनी केली.
"भारत पाकिस्तान आशिया चषक भारताने पहिल्यांदाच जिंकलेला नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र यातही राजकारण करण्यांची संधी सोडली नाही. हवा असो, पाणी असो किंवा खेळ असो नरेंद्र मोदी ध्रुवीकरण करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतात हे त्यांच्या एक्सवरील पोस्टवरून स्पष्ट होते. भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण देशाची एक विशिष्ट प्रतिष्ठा असते ती मात्र नरेंद्र मोदी जपत नाहीत," अशी नाराजी सपकाळ यांनी व्यक्त केला.