Maharashtra Politics: “सत्तेसाठी खोके घेणाऱ्यांनी बेइमानी केली, ठाकरेंच्या सर्वसमावेश हिंदुत्वामुळे...”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 13:47 IST2022-11-16T13:46:15+5:302022-11-16T13:47:32+5:30
Maharashtra News: भाजपची मनुवादी संस्कृती महिलांना तुच्छ लेखते. द्वेषमूलक राजकारण थांबावे म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करताना दिसत नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

Maharashtra Politics: “सत्तेसाठी खोके घेणाऱ्यांनी बेइमानी केली, ठाकरेंच्या सर्वसमावेश हिंदुत्वामुळे...”: सुषमा अंधारे
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यानंतर ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विभक्त पतीने शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा कोल्हापुरात आली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. सत्तेसाठी खोके घेणारे बेइमानी निघून गेलेत. आता शिल्लक राहिलेली शिवसेना इमानदार मावळ्यांची आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी नेतृत्वामुळे शिवसेनेशी विविध घटकांमधील लोक जोडले जात आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
महाप्रबोधन यात्रेला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे आधी घराणेशाहीचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप केला आणि आज तेच मंत्रिमंडळात आहेत. मोदींच्या मंत्री मंडळात मंत्री ७५ पैकी १५ घराणेशाहीतून निवडून आलेले आहेत. सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला. राहुल शेवाळे यांचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नारायण राणे यांची मुले मातोश्रीबद्दल बोलतात, पण कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली नाही, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.
भाजप पक्ष हा गोडबोले नी साखर झेले असा आहे
भाजपने द्वेषमुलक राजकारण सुरु केले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे थांबविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसारखी अमराठी माणसं महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. भाजपची मनुवादी संस्कृती महिलांना तुच्छ लेखत आहे. कुलदीप सेंगलसारख्यांना वाचवणारी हीच होती. भाजप पक्ष हा गोडबोले नी साखर झेले असा आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचे सांगतात, पण हाथरसमध्ये तरुणीचे रात्रीत अंत्यसंस्कार केले हे कोणते हिंदुत्व सांगतात? असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, सत्तेसाठी खोके घेणारे बेइमानी निघून गेलेत. आता शिल्लक राहिलेली शिवसेना इमानदार मावळ्यांची आहे, त्यामुळे आम्हाला शिल्लक सेना म्हटले तरी काही वाईट वाटणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी नेतृत्वामुळे शिवसेनेशी विविध घटकांमधील लोक जोडले जात आहे, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"