"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 15:27 IST2025-04-27T15:01:05+5:302025-04-27T15:27:54+5:30
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.

"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
Shivsena MLA Sanjay Gaikwad Controversial Statement: शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसाविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते. मात्र आता पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतल्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागितली आहे. माझा हेतू पोलिसांचे धैर्य खचवण्याचा नव्हता असे संजय गायकवाड यांनी म्हटलं.
आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसां इतके अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्र आणि भारत सोडून जगात कुठेच नाही असं म्हणत गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याची दखल घेत एकनाथ शिंदे यांना कडक समज द्यायला सांगितले. त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
"माझं वक्तव्य महाराष्ट्रातल्या संपूर्ण पोलिसांचे धैर्य खचवणे, त्यांच्या धाडसाचा आणि पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हते. जे अनुभव मला आले होते ते मी त्या ठिकाणी मांडले. माझ्या शब्दामुळे महाराष्ट्रातल्या पोलिसांची किंवा महाराष्ट्र सरकारची नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. पण मी जे काही वक्तव्य केलं ते अनुभवले आहे. माझ्या परिवारासोबत तसे झाले आहे. त्यामुळे मी तसे बोललो होतो," असे संजय गायकवाड म्हणाले. मात्र मी स्थानिक पोलिसांवर ताशेरे ओढले होते आणि त्याबाबत मी ठाम आहे, असेही संजय गयकवाड यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
"पोलिसांच्या इतके अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्र आणि भारत सोडून जगात कुठेच नाही. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, एखादा कठोर कायदा केला की एक हप्ता वाढतो. पोलिसांनी एखाद्या कारवाईत ५० लाख पकडले की ५० हजार दाखवतात. पोलिसांनी इमानदारपणे काम केले तर जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते," असं विधान गायकवाड यांनी केले होते.
मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
"उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. आमदार गायकवाड यांना कडक समज देण्यास सांगणार आहे. वारंवार असे चालणार नाही. हे योग्य नाही. मात्र, त्यानंतरही ते बोलतच असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.