विरार-बडोदा रेल्वेमार्गावर 'कवच', संभाव्य अपघात टळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:28 IST2026-02-01T15:25:48+5:302026-02-01T15:28:25+5:30
पश्चिम रेल्वेच्या विरार-बडोदा रेल्वे कॉरिडॉरवर गुरुवारी 'कवच' प्रणाली सुरु करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरून दादर-सूर्यनगरी एक्स्प्रेस ही पहिली ट्रेन चालवण्यात आली. या माध्यमातून ट्रेनचा वेग नियंत्रणात ठेवणे, समोरून येणाऱ्या ट्रेनमधील मोटरमनशी समन्वय साधणे आणि आवश्यकतेनुसार आपसूक ब्रेक लावणे शक्य होणार आहे.

विरार-बडोदा रेल्वेमार्गावर 'कवच', संभाव्य अपघात टळणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या विरार-बडोदा रेल्वे कॉरिडॉरवर गुरुवारी 'कवच' प्रणाली सुरु करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरून दादर-सूर्यनगरी एक्स्प्रेस ही पहिली ट्रेन चालवण्यात आली. या माध्यमातून ट्रेनचा वेग नियंत्रणात ठेवणे, समोरून येणाऱ्या ट्रेनमधील मोटरमनशी समन्वय साधणे आणि आवश्यकतेनुसार आपसूक ब्रेक लावणे शक्य होणार आहे.
पश्चिम रेलवेच्या बडोदा-सुरत-विरार विभागामध्ये कवच प्रणालीचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू होते. ३४४ किलोमीटरच्या विभागात ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले, नागदा-बडोदा-सुरत-विरार-मुंबई सेंट्रल या मार्गावर 'कवच' प्रकल्पासाठी ३९७कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये बडोदा-अहमदाबाद विभागात 'कवच' लागू करण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत पश्चिम रेल्वेवरील एकूण ४३५ रूट किलोमीटरमध्ये 'कवच' प्रणाली कार्यरत झाली.
टक्कर रोखण्यात महत्त्वाची भूमिका
'कवच' ही देशात विकसित करण्यात आलेली रेल्वे सुरक्षा प्रणाली असून, त्या माध्यमातून ट्रेनचा वेग नियंत्रणात ठेवणे, समोरून येणाऱ्या ट्रेनमधील मोटरमनशी समन्वय साधणे आणि आवश्यकतेनुसार आपसूक ब्रेक लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे अपघात 3 टाळण्यासाठी आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कमी दृश्यमानता, धुके किंवा प्रतिकूल हवामानातही ही प्रणाली इंजिनच्या केबिनमध्ये सिग्नलची माहिती पुन्हा दाखवून लोको पायलटला मदत करते. पश्चिम रेल्वेनुसार, सध्या 'कवच' डब्ल्यूएपी-७इंजिनांमध्ये सक्रिय असून एकूण ३६४ लोकोमोटिव्ह या प्रणालीने सुसज्ज करण्यात आले आहेत. वडोदरा-नागदा विभागातील काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर विरार-मुंबई सेंट्रल विभागात सप्टेंबर २०२६ पर्यंत 'कवच' लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गाड्यांची अचूक स्थिती प्रणालीमुळे समजणार
विरार-बडोदा विभाग 'कवच'ने सुसज्ज करणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होते. या मार्गावरील प्रत्येक स्थानक व ऑटोमॅटिक सिग्नलिंग सेक्शनसाठी स्वतंत्र डिझाइन तयार करण्यात आले आहे. संपूर्ण ट्रॅकवर ८,००० हून अधिक ठिकाणी आरएफआयडी टॅग बसवण्यात आले असून, त्यामुळे गाड्यांची अचूक स्थिती व वेगावर सातत्याने नजर ठेवता येणार आहे. तसेच, स्थानके आणि इंजिनांदरम्यान अखंड रेडिओ संपर्कासाठी ५७ कम्युनिकेशन टॉवर्स उभारण्यात आले असून, संपूर्ण मार्गावर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे.