PM मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:15 IST2021-06-10T16:13:38+5:302021-06-10T16:15:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त (NCP Foundation Day) आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

PM मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त (NCP Foundation Day) आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी मराठा व ओबीसी आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली भेट यांसारख्या अनेक मुद्द्यांवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य करत भूमिका मांडली. (sharad pawar reaction over pm narendra modi and uddhav thackeray meet)
आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे कौतुक करत तो विश्वासाचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. हे सरकार नुसते काम करणार नाही, तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रिक काम करून सामान्य जनतेचे देशात आणि राज्या प्रतिनिधित्वही करेल यात शंका नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शिवसेना विश्वास असणारा पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता
एकांतात मोदींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तेव्हा अनेक शंका घेण्यात आल्या. पण शिवसेना विश्वासाचा पक्ष आहे. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले. जनात पक्षाचे राज्य आले, त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेस पराभूत झाली. असे असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही
सलग १५ वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झाले. त्या आधी त्यांचे कतृत्व कधी दिसले नाही पण या आता ते जबाबदारीने आपले काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली. सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसे झाले तर ती भ्रष्ट होते. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला आपण या सत्तेचा भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे, असे शरद पवार म्हणाले.