...तर मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम, राजन साळवींचं सूचक विधान; वरिष्ठांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 19:43 IST2025-01-03T19:41:49+5:302025-01-03T19:43:31+5:30
माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

...तर मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम, राजन साळवींचं सूचक विधान; वरिष्ठांवर आरोप
रत्नागिरी - कोकणात माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गट सोडण्याचे संकेत दिले आहेत. राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर राजन साळवी यांनी पक्षातील वरिष्ठ नेते माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत असा आरोप करत भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यास मी सक्षम आहे असं थेट विधान केले आहे.
लांजा येथील कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर राजन साळवींनी माध्यमांशी संवाद साधला. साळवी म्हणाले की, गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून विविध चर्चा रंगल्या आहेत. मला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आमच्याशी संवाद साधावा. त्यानंतर मी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात राजन साळवी यांच्यावर अन्याय झालेला आहे असा सूर कार्यकर्त्यांचा होता. पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. लांजा येथील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय निश्चित घेईन अशा भावना मी कार्यकर्त्यांसमोर मांडल्या आहेत असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय माझ्या पराभवाला कारणीभूत काही वरिष्ठ मंडळी आहेत. मी त्यांचे नाव घेणार नाही. ते शोधणे गरजेचे आहे. आज जो दु:खाचा डोंगर पक्षावर, माझ्यावर वैयक्तिक माझ्या कुटुंबावर आला याला कारणीभूत कोण आहेत हे शोधणे गरजेचे आहे. जर नाही शोधले तर भविष्यात आज जी माझ्यावर वेळ आली आहे ती अन्य कुणावरही येऊ शकते. ती वेळ येऊ नये त्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मी सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.
२४ तासानंतर राजन साळवींचा यू टर्न?
मागील काळात कोकणातील माजी आमदार राजन साळवी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यावर गुरुवारी राजन साळवी यांनी भाष्य केले. ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ मध्ये झालेल्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो. पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करत आहे. मीडियातून मला समजले की, मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काही नाही. रोजच्या कामात माझे मार्गक्रमण सुरू आहे. अशा बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले होते. त्यानंतर आज साळवींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.