पॅकेट नाही तर पॅकेज म्हणा..!
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भिवंडीतील विविध समस्या मांडणे आणि विकास कामांच्या पाठपुराव्याबाबत आ. रईस शेख यांनी मुद्दे उपस्थित केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मारण्यात आलेले चर बुजविण्यासाठी निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भटक्या कुत्र्यांच्या समस्येला देखील त्यांनी वाचा फोडली. मात्र यासाठी निधी मिळत नसून आता तुम्ही पॅकेट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. मात्र यावरून सभागृहात पॅकेट म्हणजे काय? अशी चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॅकेट नाही हो, पॅकेज म्हणा पॅकेज असे सांगितले. यावरून सभागृहात एकच हशा पिकला.
वनमंत्री ‘कंत्राटीं’ना न्याय देतील का?
नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी, ठोक मानधन पद्धतीने शेकडो कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर मागील १५ वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेत. सेवेत कायम करण्यासाठी तसेच समान काम, समान वेतनासाठी त्यांनी अनेकदा मागण्या, आंदोलने केली आहेत. महापालिकेने मागच्या वर्षी राबविलेल्या सरळ सेवाभरती प्रक्रियेलादेखील या कर्मचाऱ्यांनी न्यायालयातून तात्पुरती स्थगिती आणून आधी आमचा प्रश्न मार्गी लावा, अशी भूमिका त्यांनी घेतली. आता वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनखाली महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आली असून ते या कर्मचाऱ्यांना न्याय देतील का? महासभेत विशेष ठराव आणून हे सर्व कर्मचारी कायम होतील का?, असा प्रश्न हे कामगार विचारत आहेत.
उपमहापौर दामले यांनी थेटच सांगितले
कल्याण-डोंबिवली महापौर, उपमहापौर या पदांची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. शिंदेसेनेच्या ॲड. हर्षाली थविल या महापौर तर भाजपचे राहुल दामले उपमहापौर झाले. सभागृहात दोघांनी मनोगते मांडली. दामले यांनी महापौर थविल यांचे अभिनंदन केले. विकासकामांना माझे नेहमीच सहकार्य असेल, पण जर मला विचारात घेतले तर मी माझे मत मांडेन, सहकार्य करेन, अन्यथा नाही, असे स्पष्टच शब्दांत सांगितले. त्यावर सगळेच थोडे आश्चर्यचकित झाले. महापालिकेचे कामकाज अजून सुरू नसले झाले तरी दामले यांच्या सूचक मनोगतामधून भाजप-शिंदे सेनेत आगामी काळात कसे संबंध असतील, याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
रील- रियलमधील फरक कळला असेल
मोबाइल रिलच्या माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी आणि मतदारांमधील लोकप्रियता, यात फरक काय असतो, ते नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत दिसून आले. निर्मला नवले या माजी सरपंच सोशल मीडियावरील वेगवेगळ्या व्हिडीओमुळे कायम चर्चेत असतात. शिरूर पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. पण भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी २,७०० मतांनी त्यांचा पराभव केला. आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला यांना राजकारणात टिकायचे तर तुमच्या कार्यक्षेत्रात लोकप्रिय असणे महत्त्वाचे असते, सोशल मीडियावर नाही, हे त्यांना आता कळलेच असेल, अशी चर्चा शिरूरच नव्हे तर मुंबईच्या गल्लीबोळांत होत आहे.
Web Summary : An MLA's 'packet' request for funds led Eknath Shinde to correct him, sparking laughter. Other news includes contractor issues, KDMC politics, and social media's impact on elections.
Web Summary : एक विधायक के फंड के लिए 'पैकेट' अनुरोध पर एकनाथ शिंदे ने उन्हें सुधारा, जिससे हंसी गूंजी। अन्य खबरों में ठेकेदार मुद्दे, केडीएमसी राजनीति और चुनावों पर सोशल मीडिया का प्रभाव शामिल है।