Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:29 IST2025-11-01T11:26:53+5:302025-11-01T11:29:14+5:30
MNS MVA Satyacha Morcha Mumbai Update: पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नसली तरी या मोर्चासाठी पुढाकार घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निघाले आहेत. यासाठी राज यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे.

Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात विरोधक आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढणार आहेत. यासाठी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चास्थळी जमण्यासाठी सुरुवात झाली आहे. पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नसली तरी या मोर्चासाठी पुढाकार घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निघाले आहेत. यासाठी राज यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे.
या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत. दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून हा मोर्चा सुरू होणार असून मेट्रो सिनेमाच्या समोरून तो महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबणार आहे. तिथे सभेत रुपांतर होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मोर्चाच्या निमित्ताने बंदोबस्त वाढविला असून कारवाई केली जाण्याचा इशारा देखील सत्ताधाऱ्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंनी दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास केला. राज ठाकरेंना अचानक लोकल ट्रेनमध्ये पाहून प्रवासी शॉक झाले होते. काही प्रवाशांनी राज यांच्या भोवती गर्दी देखील केली. राज यांनी सर्वांना अभिवादन केले, तसेच एका प्रवाशाला त्याच्याकडील रेल्वेच्या तिकीटावर ऑटोग्राफही दिला.
कोणाकोणाचा सहभाग ?
या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेसचे कोण नेते सहभागी होणार याबाबत संभ्रम आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता, पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी होतील, एवढेच ते म्हणाले.
निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मतदार याद्यांतील गोंधळ व बोगस मतदारांचा घोळ दूर करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती उद्धवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीत न्यायालयात जाणे, निवडणुकांवर बहिष्कार व निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणे या पर्यायावर चर्चा झाल्याचे मनसे सूत्रांनी सांगितले.