"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 10:22 IST2025-02-04T09:45:39+5:302025-02-04T10:22:27+5:30
मारूती कांबळेचं काय झालं, तसे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे असं संजय राऊत म्हणाले.

"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत"
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत, त्याठिकाणी लॉनमध्ये काहीतरी खोदकाम केले होते, तिथे कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत असं तिथला स्टाफ आणि भाजपातील आतील गोटातून चर्चा आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.
सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही अंधश्रद्धा निर्मुलन कायदा मानणारे आहोत परंतु काही चर्चा सुरू आहेत. कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग काही लोकांनी आणलीत. ती शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरलीत. मुख्यमंत्रिपद दुसऱ्या कुणाकडे टिकू नये असं काही आहे. तिथला कर्मचारी वर्ग तसं सांगतायेत. आम्ही मुद्दा लावून धरत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हा प्रतिष्ठेचा विषय आहे. तिथे काय झालंय, काय घडलंय, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकी भीती कशाची आहे. ते अस्थिर आणि अस्वस्थ का आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच मारूती कांबळेचं काय झालं, तसे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे तिथे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जात नाहीत, राहायला गेलो तरी मी झोपायला जाणार नाही असं फडणवीस म्हणतायेत असं ऐकण्यात आले. हा काय प्रकार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे शिंदे गटात जे लिंबूसम्राट आहेत त्यांनी उत्तर द्यावे असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह नेत्यांना लगावला आहे.
दरम्यान, सकाळी मुलाखत घेणे बंद केले तर काळी जादू बंद होईल. एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आता मीदेखील त्यांच्या अर्धा तास अगोदर पत्रकार परिषद घेणार आहे. त्यांचं किती मनावर घेता, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचं काही मनावर घेतले नाही म्हणून आमचे ८० पैकी ६० निवडून आलेत असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.