...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 05:23 PM2020-01-02T17:23:04+5:302020-01-02T17:28:48+5:30

'आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?'

Sanjay Raut attack BJP on No Maharashtra tableau at this year's R-Day parade | ...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल

...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल

Next

मुंबई : प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत, यामागे राजकीय षडयंत्र आहे काय? असा सवाल ट्विटच्या माध्यमातून करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?" याचबरोबर, "महाराष्ट्र आणि प. बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत यामागे राजकीय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?" सवाल सुद्धा संजय राऊत यांनी ट्विटवर केला आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून. विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.'' असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पाडली आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र नंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये 'शिवराज्याभिषेक' या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैळपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल आला होता. पुढे 1993/94/95 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. 2015 मध्ये पंढरीची वारी ह्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने अव्वल स्थान पटकावले होते.    
 

Web Title: Sanjay Raut attack BJP on No Maharashtra tableau at this year's R-Day parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.