आधुनिक शेतीच्या उत्तम प्रयोगासाठी सांगलीच्या प्रतीक पाटील यांचा लोकमततर्फे हाँगकाँग येथे सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:49 IST2025-03-31T09:44:06+5:302025-03-31T09:49:11+5:30
Prateek Patil News: सहकारी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राविषयी नवीन प्रयोग करु पाहणाऱ्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांना याच प्रयत्नांची त्यांच्या मेहनतीची पोचपावती म्हणून नुकताच हाँगकाँग येथे लोकमत ग्लोबल एक्सलन्स हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आधुनिक शेतीच्या उत्तम प्रयोगासाठी सांगलीच्या प्रतीक पाटील यांचा लोकमततर्फे हाँगकाँग येथे सन्मान
मुंबई : सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. सांगली जिल्ह्याला जसा क्रांतिकारकांचा, राजकारणाचा वारसा लाभला आहे, तसेच सांगली जिल्ह्याला सहकाराची पंढरीही त म्हटले जाते. कारण या भागात सहकार चळवळीच्या झाडाची पाळेमुळे घट्ट करण्याचे काम लोकनेते राजारामबापू पाटील यांनी केले.. बापूंनी साखर कारखाने, शैक्षणिक संस्था नवनवीन गोष्टी आणून या भागाची प्रगती करण्याचा प्रयत्न केला. या लोकनेत्याचा वारसा सांगणाऱ्या, तसेच सहकारी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राविषयी नवीन प्रयोग करु पाहणाऱ्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांना याच प्रयत्नांची त्यांच्या मेहनतीची पोचपावती म्हणून नुकताच हाँगकाँग येथे लोकमत ग्लोबल एक्सलन्स हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या आजोबांचे सहकार क्षेत्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान, वडिलांचे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अढळ स्थान असले, तरीही प्रतीक पाटील यांनी हा वारसा यशस्वीपणे सांभाळला आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना प्रतीक जयंतराव पाटील यांनी कृषी क्षेत्रात एक आधुनिक क्रांतीची वाट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घालून दिली, नवनवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपरिक शेतीला आधुनिकतेचा आयाम देण्याचे काम प्रतीक पाटील करत आहेत.
प्रतीक पाटील यांनी २०१० साली मुंबई विद्यापिठामधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे शिक्षण पूर्ण करुन त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकमधून इनोव्हेशन आणि एट्रप्रेनरशिपमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतरही त्यांनी वॉर्टन स्कूल पेनिसेल्विया या उच्च विद्याविभूषित शिक्षण संस्थेमधून एक्झक्युटिव्ह प्रोग्रॅम फॉर स्ट्रेटेजी हा कोर्स पूर्ण केला. प्रतीक पाटील यांनी स्वतःचा व्यवसाय करत असताना यशापयशाच्या अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन आज शेतकरी हितासाठी काम करत राहिले व करत आहेत.
२०२३ साली राजराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाची धुरा प्रतीक पाटील यांनी हातामध्ये घेतली. कारखान्याची जबाबदारी सांभाळताच आपल्या भागातील शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यासाठी त्यांनी नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी सुरुवात केली. यामध्ये सुरुवातीच्या दिवसात 'शेतकरी संवाद दौरा करुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर ऊसशेतीचा सूक्ष्म अभ्यास करुन शेतकऱ्यांसाठी 'राजारामबापू शेतकरी मार्गदर्शक पुस्तिका' सुरु केली.
कारखान्यासोबत वेगवेगळ्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ५० हजारांपेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी सभासद बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय प्रतीक पाटील यांनी घेऊन शेतकरी हित जपण्याचे काम केले. प्रतीक पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान वाळवा तालुक्यात विकसित केले, तसेच हा
महाराष्ट्रातील एकमेव कारखाना आहे, ज्याने मल्टिस्पेक्ट्रल ड्रोनद्वारे पिकांच्या संदर्भातील कीड प्रादुर्भावापासून सरीतील तणाबद्दल अचूक माहिती मिळविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.
प्रतीक पाटील यांनी नुकत्याच सुरु केलेल्या 'राजारामबापू ठिबक सिंचन योजना आणि क्षारपड जमीन सुधारण्यासाठी 'समृद्ध भूमी अभियान योजना' या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये नवसमृद्धी आणणाऱ्या योजना सुरु केल्या, तसेच सवलतीच्या दरात अवजारे वाटप केले. कारखान्याच्या राजाराम बापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या सोईसाठी पाणंद रस्ते, बोअर, व्यायाम शाळा, यांसारखे उपक्रम सुरु आहे.
लोकनेते राजाराम बापूंच्या विचारांचा पदयात्री
शेवटी काय ? तर स्व. राजाराम बापू पाटील यांनी पदयात्रेच्या माध्यमातून आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यांची पदयात्रा इतकी यशस्वी झाली की, या पदयात्रीचे पाऊल ज्या ज्या ठिकाणी पडले, त्या भागाचा विकास झाला. बापूंची ही विकासाची पदयात्रा बापूंच्या पश्चात जयंतराव पाटील यांनी सुरूच ठेवली. अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री, जलसंपदामंत्री अशी विविध पदे भूषवित त्यांनी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात विकास नेला आणि प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून या पदयात्रेला आणखी एक पदयात्री जोडला गेला आहे. जो नव्या विचारांचा आहे, नव्या पिढीचा आहे आणि आधुनिक विचारांच्या माध्यमातून नव्या पिढीला साद घालत ही पदयात्रा पुढे नेणार आहे.