मुंबई/कसारा/इगतपुरी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होऊन १९ दिवस होत नाही तोच या मार्गावर खड्डे पडले आहेत. ७६ किमी लांबीच्या या मार्गासाठी २,८०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आमने येथून पुढे ३१ किलोमीटरवर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे राज्य महामंडळाच्या रस्ते विकास (एमएसआरडीसी) कामावर टीका होत आहे. (samruddhi mahamarg latest news in marathi)
मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने ७०१ किमी लांबीच्या महामार्गाची उभारणी केली आहे. त्यासाठी ६१ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यातील आमने ते इगतपुरी या ७६ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जूनला लोकार्पण झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. शेवटच्या टप्प्याच्या महामार्गावर अनेक त्रुटी आहेत. २० दिवसांत ११ अपघात झाले आहेत. अनेक वाहने नादुरुस्त होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
सतत पावसाचा फटका
नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीने हे काम केले आहे. या मार्गावर उभारलेल्या अंडरपासवर उभारलेल्या रस्त्यावर हे खड्डे पडले आहेत. मात्र, काँक्रीटच्या रस्त्याला कोणतीही हानी झाली नाही.
काँक्रीटच्या अंडरपासवर डांबरीकरण केले आहे. येथे सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे डांबरावर एका ठिकाणी छोटे खड्डे पडले आहेत. मात्र, पुलाच्या स्ट्रक्चरला कोणतीही हानी झाली नाही. आता खड्डे भरण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
यापूर्वी पुलावर भेगा, पॅनल कोसळले
समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुला करण्यापूर्वी एप्रिलमध्ये या ७६ किमी लांबीच्या मार्गाच्या २४ पॅनलला काही भेगा आढळल्या होत्या. त्यावेळीही 'एमएसआरडीसी'वर टीका झाली होती, तसेच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरजवळ पुलावरील पॅनल कोसळल्याचे समोर आले होते.
गेल्यावर्षी जुलैमध्ये 'समृद्धी'वर छत्रपती संभाजीनगरजवळ ४० मीटर अंतरावर सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्या होत्या. परिणामी या मार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.