Sadabhau Khot News: महाराष्ट्रातील मराठी माणसाची मराठी भाषा धोक्यात आलेली नाही. ही लढाई खुर्चीची आहे. मराठी भाषेची नाही. मराठी भाषेची ही लढाई तुमची असती, तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता. लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघाले आहेत. ते लोक मराठी वाढवत आहेत. तुम्ही काय वाढवत आहात. तुम्ही फक्त ही भाषा बोलू नका, ती भाषा बोलू नका, असे सांगत आहात, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली.
इयत्ता पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवण्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. ५ जुलैला मनसेचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला उद्धव ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही या मोर्चाचे समर्थन केले आहे. दोन्ही गट या मोर्चात सहभागी होणार आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीत हिंदीच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच सदाभाऊ खोत यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.
मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात
मी माझ्या मुलांना इंग्रजी का शिकवू नये, असा सवाल करतानाच, आयएस अधिकारी होताना इंग्रजी लागते ना, युपीएससीच्या परीक्षेला इंग्रजी लागते ना, परराष्ट्र सचिव होताना इंग्रजी लागते ना, मग ते का माझ्या लेकरांनी का शिकायचे नाही, जे आज आंदोलन करत आहेत त्यांना माझा साधा प्रश्न तुमच्या लेकरांना इंग्रजी येते का? विमानात बसल्यावर तुमची मुले इंग्रजीत बोलतात ना? तुमची लेकरे कोणत्या मराठी भाषेत शिकली त्यांची नावे आम्हाला सांगा? अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच मराठी भाषा गावगाड्यातील माणसांनी जपली आहे. मराठी भाषा धोक्यात आली नाही तर यांच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
दरम्यान, आमची मराठी भाषा चिरकाल टिकणार आहे. मराठी भाषेवर आक्रमण हा ढोंगीपणा आहे. माझ्या लेकराला हिंदी इंग्रजी आले पाहिजे, कारण मला जगाबरोबर चालायचे असेल तर ती भाषा आली पाहिजे. त्यांची लेकरे इंग्रजी बोलायला लागली आहेत. तुमची लेकरे चांगल्या शाळेत शिकणार इंग्रजी बोलणार. जगात जाणार, वेगवेगळे देश फिरणार आणि इथे येऊन तुम्ही सांगणार दुसरी भाषा शिकता कामा नये, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला.