Maharashtra election 2019 : पश्चिम विदर्भात जातीय समीकरणांची विकासावर कुरघोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:58 AM2019-10-16T05:58:21+5:302019-10-16T05:58:49+5:30

उर्वरित मतदारसंघांमध्ये विकासाच्या मुद्यांऐवजी जातीय समीकरणांच्या मांडणीवरच जोर दिला जात आहे.

Rumors on the development of racial equations in western Vidarbha | Maharashtra election 2019 : पश्चिम विदर्भात जातीय समीकरणांची विकासावर कुरघोडी

Maharashtra election 2019 : पश्चिम विदर्भात जातीय समीकरणांची विकासावर कुरघोडी

googlenewsNext

अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला पश्चिम विदर्भ, स्वातंत्र्यानंतर तब्बल चार दशकांपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता; मात्र १९९० नंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या भगव्या युतीने या भागात हातपाय पसरायला प्रारंभ केला आणि कालांतराने मोजक्या विधानसभा मतदारसंघांचा अपवाद वगळता, हा भाग भगव्या युतीचा गड बनला.


धानसभा निवडणुकीच्या प्रचाराने अखेरच्या टप्प्यात प्रवेश केला असताना, पश्चिम विदर्भात मोजके अपवाद वगळता उर्वरित मतदारसंघांमध्ये विकासाच्या मुद्यांऐवजी जातीय समीकरणांच्या मांडणीवरच जोर दिला जात असल्याचे चित्र आहे. विभागातील एकूण ३० पैकी अनेक मतदारसंघांमध्ये स्वपक्षाच्या अथवा मित्र पक्षाच्या बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे.
सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये विजय मिळवून सेना-भाजप युतीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला आक्रमक प्रचार करून विकासाच्या मुद्यांवर युतीला जेरीस आणण्याची संधी होती; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वगळता आघाडीचा एकही बडा नेता प्रचारासाठी पश्चिम विदर्भाकडे फिरकला नसल्याने आघाडीचे कार्यकर्ते व समर्थकही बुचकळ्यात पडले आहेत. कोणत्याही ठोस मुद्याच्या अभावी, निवडणूक प्रामुख्याने स्थानिक जातीय समीकरणे आणि काही मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीच्या भोवतीच फिरत असल्याचे दिसत आहे.


अकोल्यात युतीचे पारडे जड
अकोला पश्चिम व अकोला पूर्व या दोन मतदारसंघात भाजपने उभे केलेले आव्हान मोडून काढण्यासाठी विरोधकांना प्रयत्न करावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व राष्टÑवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह एमआयएमचा जिल्ह्यातील एकमेव उमेदवार रिंगणात असल्याने, जातीय समीकरणे महत्त्वाची ठरली आहेत. या मतदारसंघात भाजप, शिवसंग्राम व काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत बंडखोरी टाळली असली तरी, प्रत्यक्षात नाराजी दूर झाली का, हा कळीचा प्रश्न आहे. मूर्र्तिजापूरमध्ये भाजप उमेदवारास स्वपक्षातूनच विरोध होत आहे. भरीस भर म्हणून शिवसैनिकही विरोधात गेले आहेत. या मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस भाजपपुढे आव्हान निर्माण करताना दिसत आहे. अकोट मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्येच लढत आहे; मात्र शिवसेनेचा बंडखोर उमेदवार आणि बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा उमेदवार किती मते घेतो, यावर निकाल ठरेल, असे दिसत आहे.


अमरावतीत नवख्यांचे आव्हान
अमरावती जिल्ह्यात मातब्बरांसमोर नवख्यांनी आव्हान उभे केले आहे. अमरावतीमध्येही निवडणूक विकासाच्या मुद्यांऐवजी जातीय समीकरणांभोवतीच फिरताना दिसत आहे. मावळत्या विधानसभेत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार भाजपच्या, दोन काँग्रेसच्या आणि दोन अपक्षांच्या ताब्यात होते. सात मतदारसंघांमध्ये मावळते आमदार पुन्हा मैदानात उतरले आहेत; मात्र अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या मेळघाटचे युवा आमदार प्रभुदास भिलावेकर यांना डच्चू देऊन, भाजपने प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिलेल्या रमेश मावस्कर यांना रिंगणात उतरविले आहे.
अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या दर्यापूर मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी मावळते आमदार रमेश बुंदिले यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. वरूडमध्ये कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्यासमोर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांनी दंड थोपटले आहेत. विदर्भात महाआघाडीने केवळ हीच जागा ‘स्वाभिमानी’ला सोडली आहे. धामणगावमध्ये कॉंग्रेसतर्फे वीरेंद्र जगताप चवथ्यांदा रिंगणात असून, भाजपने नगराध्यक्ष प्रताप अडसड यांना मैदानात उतरविले आहे. उभयतांमध्ये काट्याची लढत अपेक्षित आहे. तिवसा मतदारसंघात कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर तिसऱ्यांदा नशीब आजमावित असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे त्यांना आव्हान देत आहेत. बडनेरा मतदारसंघात तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेले अपक्ष आमदार रवी राणा यांना आव्हान देण्यासाठी, शिवसेनेने माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्यावर डाव खेळला आहे.
अमरावतीत भाजपचे सुनील देशमुख आणि काँग्रेसच्या सुलभा खोडके यांच्यातही चुरशीची लढत होत आहे. अचलपूर मतदारसंघात ‘प्रहार’चे बहुचर्चित आमदार बच्चू कडू यांना काँग्रेसचे बबलू देशमुख आणि शिवसेनेच्या सुनीता फिस्के आव्हान देत आहेत. वरूड व अचलपूर मतदारसंघात माळी समाज, तर अमरावती मतदारसंघात मुस्लीम समाजाची मते निर्णायक ठरू शकतील, असे आजचे चित्र आहे.


यवतमाळात बंडखोरीला उधाण
यवतमाळ जिल्ह्यातील सातपैकी पुसद व राळेगाव या मतदारसंघात थेट, आर्णी, यवतमाळ, दिग्रस व उमरखेडमध्ये तिरंगी, तर वणी मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढविली आहे. दिग्रसमध्ये शिवसेना उमेदवार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी बंडखोरी करीत, दंड थोपटल्याने लढत काट्याची होत आहे. यवतमाळात पालकमंत्री मदन येरावार यांच्यापुढे काँग्रेसने दिलेला नवा चेहरा बाळासाहेब मांगुळकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. येथे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे कुणासाठी डोकेदुखी ठरतात, याकडे नजरा लागल्या आहेत. राळेगावात भाजपचे डॉ. अशोक उईके व कॉंग्रेसचे प्रा. वसंत पुरके या आजी-माजी मंत्र्यांमध्ये लढत होत आहे. आर्णीमध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी केलेले आमदार राजू तोडसाम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे व भाजपचे उमेदवार माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तोडसाम यांची बंडखोरी भाजपला नुकसानदायक ठरू शकते.
उमरखेडमध्येही भाजपने विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी नाकारत नगराध्यक्ष नामदेव ससाने यांच्या रुपाने नवीन चेहरा दिला; परंतु शिवसेनेचे बंडखोर डॉ. विश्वनाथ विणकरे यांची उमेदवारी युतीच्या मतांमध्ये खिंडार पाडणारी ठरू शकते. पुसदमध्ये भाजपचे अ‍ॅड. नीलय नाईक व राष्टÑवादी काँग्रेसचे इंद्रनील मनोहरराव नाईक या दोन चुलत भावंडांमध्ये थेट लढत होत आहे. वणी मतदारसंघात शिवसेनेच्या दोन व राष्टÑवादी काँग्रेसच्या एका बंडखोरामुळे पंचरंगी लढत होत आहे. भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व कॉंग्रेस नेते वामनराव कासावार यांच्यात प्रमुख लढत दिसत असली तरी, संजय देरकर, विश्वास नांदेकर आणि डॉ. महेंद्र लोढा यांच्या उमेदवारीने रंगत आणली आहे. जिल्ह्यात तीन ते चार मतदारसंघात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. भाजपच्या ताब्यातील जागा खेचून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत, तर गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून खेचलेल्या जागा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.


बुलडाण्यात जातीय समीकरणेच प्रभावी
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणेच प्रभावी सिद्ध होतील, असे चित्र दिसत आहे. बंडखोरी थोपविण्यात बव्हंशी यश आले असले तरी, बुलडाण्यात भाजपचे बंडखोर उमेदवार योगेंद्र गोडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात उतरलेले शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेना उमेदवार संजय गायकवाड यांची डोकेदुखी वाढवली आहे. जळगाव जामोदमध्ये कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. डॉ. कुटेंशी काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा सामना होत आहे.
सिंदखेड राजामध्ये शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत होत आहे. डॉ. खेडेकरांची प्रतिष्ठा, तर डॉ. शिंगणेंचे राजकीय अस्तित्वच पणाला लागले आहे. चिखलीत भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्यात थेट लढत होत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांची चिखलीतील जाहीर सभा भाजपसाठी जमेची बाजू ठरली. मलकापूरमधून भाजपचे विद्यमान आमदार चैनसुख संचेती पुन्हा रिंगणात असून, त्यांचा सामना काँग्रेसचे राजेश एकडे यांच्याशी होत आहे. खामगावात भाजपचे अ‍ॅड. आकाश फुंडकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे शरद वसतकार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मेहकरमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर आणि काँग्रेसचे अ‍ॅड. अनंत वानखेडे यांच्यात थेट लढत होत आहे.


वाशिममध्ये युतीत बिघाड, आघाडीत गटबाजी
वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये युती धर्माचे न होत असलेले पालन व महाआघाडीतील गटबाजी अधिकृत उमेदवारांना भोवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाशिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नीलेश पेंढारकर यांनी दंड थोपटले आहेत आणि जिल्हा प्रमुखासह संपूर्ण

Web Title: Rumors on the development of racial equations in western Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.