रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओ ‘अॅक्शन मोड’मध्ये.. रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात
By सुमेध वाघमार | Updated: January 8, 2026 19:15 IST2026-01-08T19:12:59+5:302026-01-08T19:15:30+5:30
Nagpur : वाढत्या रस्ते अपघातांना लगाम घालण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाची शिस्त लावण्यासाठी आरटीओ ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. राज्यभरात 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' राबवले जात आहे.

RTO in 'action mode' to prevent road accidents.. Road safety campaign begins
नागपूर: वाढत्या रस्ते अपघातांना लगाम घालण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाची शिस्त लावण्यासाठी आरटीओ ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. राज्यभरात 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' राबवले जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून बुधवार, ७ जानेवारी रोजी अमरावती रोडवरील गोंडखैरी टोल नाका येथे वाहनचालकांसाठी विशेष प्रबोधन आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षकांनी टोल नाक्यावर थांबणाºया शेकडो वाहनचालकांशी थेट संवाद साधला. महामार्गावर वाहन चालवताना 'लेन डिसिप्लिन' (लेनची शिस्त) पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. तसेच, चारचाकी वाहन चालवताना केवळ दंडाच्या भीतीने नव्हे, तर स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट लावण्याचे आवाहन करण्यात आले.
अपघात टाळण्यासाठी 'रिफ्लेक्टर'चे महत्त्व
रात्रीच्या वेळी महामार्गावर उभी असलेली किंवा संथ गतीने चालणारी अवजड वाहने न दिसल्यामुळे अनेक भीषण अपघात होतात. हे टाळण्यासाठी परिवहन संवर्गातील वाहनांना प्रकाश परावर्तक (रिफ्लेक्टर) लावण्याची मोहीम राबवण्यात आली. अनेक वाहनांना घटनास्थळीच नवीन रिफ्लेक्टर्स लावण्यात आले, जेणेकरून रात्रीच्या अंधारातही वाहने दुरून स्पष्ट दिसतील.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, स्कूल बस चालकांसाठी घेतलेली विशेष खबरदारी. विद्यार्थ्यांची ने-आण करणाºया स्कूल बस चालकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 'फर्स्ट एड किट' (प्रथमोपचार पेटी) चे वाटप करण्यात आले. शालेय बसमध्ये तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध असावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
माहिती पुस्तिकेचे वाटप
वाहनचालकांना रस्ते सुरक्षेचे नियम सदैव स्मरणात राहावेत, यासाठी ‘आरटीओ’च्यावतीने रस्ते सुरक्षा नियमावली असलेल्या माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. मद्यपान करून वाहन न चालवणे, वेगमयार्देचे पालन करणे आणि मोबाईलचा वापर टाळणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक प्रताप राऊत, एकनाथ ठाणगे, विशाल भोवते, अभिजित टाले आणि बोबडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून वाहनचालकांना मार्गदर्शन केले.
रस्ते सुरक्षा ही जीवनशैली बनावी
"रस्ते सुरक्षा ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती जीवनशैली बनली पाहिजे. नियमांचे पालन केल्यास आपण ९० टक्के अपघात टाळू शकतो. वाहनचालकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाचा विचार करूनच वाहन चालवावे."
- किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर