इसवी सन पूर्वकाळात कोकणातून भारतात आले रोमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 06:34 PM2021-07-17T18:34:22+5:302021-07-17T18:38:16+5:30

History Kolhapur Rom : इसवी सन पूर्वकाळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते, याचा नाणेघाटातील शिलालेख उपलब्ध होता; परंतु त्यांनी कोकणातून भारतात प्रवेश केल्याचे आणि तेथून ते सर्व भारतभर पसरल्याचे नवे संशोधन सांगली जिल्ह्यातील कुरळपचे युवा संशोधक सचिन भगवान पाटील यांनी केले आहे. रोमन व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक मागे ठेवलेल्या दिशादर्शक दगडी चक्रव्यूहाच्या चिन्हांमुळे नवा पुरातत्वीय शोध उजेडात आला आहे.

The Romans came to India from Konkan in the early years | इसवी सन पूर्वकाळात कोकणातून भारतात आले रोमन

कवठेमहांकाळ तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.

googlenewsNext
ठळक मुद्देइसवी सन पूर्वकाळात कोकणातून भारतात आले रोमनसांगलीच्या युवकाचे पुरातत्वीय संशोधन : चार दगडी चक्रव्यूहाने दिले पुरावे

संदीप आडनाईक

कोल्हापूर : इसवी सन पूर्वकाळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते, याचा नाणेघाटातील शिलालेख उपलब्ध होता; परंतु त्यांनी कोकणातून भारतात प्रवेश केल्याचे आणि तेथून ते सर्व भारतभर पसरल्याचे नवे संशोधन सांगली जिल्ह्यातील कुरळपचे युवा संशोधक सचिन भगवान पाटील यांनी केले आहे. रोमन व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक मागे ठेवलेल्या दिशादर्शक दगडी चक्रव्यूहाच्या चिन्हांमुळे नवा पुरातत्वीय शोध उजेडात आला आहे.

रोमशी संबंध दृढ करणारी चार दगडी चक्रव्यूहे त्यांना सांगली जिल्ह्यात आढळली आहेत. ढेंगेवाडी, ऐतवडे बुद्रुक आणि वशी येथे तीन (ता. वाळवा), तर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे एक, अशा या चार दगडी चक्रव्यूहांचा त्यांनी अभ्यास करून त्यावर सादर केलेल्या या आठ पानी पुरातत्वीय शोधनिबंधाला शुक्रवारी लंडनच्या केर्डोरिया "CAERDROIA" The Journal of Maze and Labyrinth या मासिकाच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले आहे.

सचिन पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून चक्रव्यूह व त्याच्या भारतातील पुरातन रचना, तसेच या संरचनेचा महाराष्ट्रातील अवशेष व इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारीसंबंध या अनुषंगाने अभ्यास करीत आहेत. रोमन चलन क्रेट क्वाइनवर ही चक्रव्यूह मुद्रा आजही आढळते.

या पाऊलखुणा जपण्याची गरज
दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील मानोली, गजापूरजवळील रानातही याच प्रकारचे उद्‌ध्वस्त चक्रव्यूह आढळले असून, बॉक्साइडचे उत्खनन, रिसॉर्टसाठी, तसेच रत्नागिरीहून येणाऱ्या गॅस पाइपलाइनसाठी या पुरातत्वीय पाऊलखुणा जेसीबीच्या साहाय्याने नष्ट झाल्याचा दुर्दैवी प्रकार उघड झाला आहे. अशाच पाऊलखुणा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही आहेत, त्या पुढील जागतिक संशोधनासाठी जपण्याची गरज आहे.
रोमन-पश्चिम महाराष्ट्र व्यापाराचा नवा संदर्भ
या नव्या संशोधनामुळे रोमन पश्चिम महाराष्ट्रातून विशेषत: भारतात व्यापारासाठी प्रवेश करत होते, हा नवा संदर्भ उजेडात आला आहे. ते सातवाहन काळात समुद्रमार्गे भारतात आले आणि त्यांनी पठारी प्रदेशात येताना दिशादर्शक म्हणून या काही दगडी चक्रव्यूह रचना मांडल्या. यापूर्वी प्रो. सांकरिया यांच्या कोल्हापुरातील ब्रह्मपुरीतील उत्खननातील संदर्भ याला पूरक आहेत. या उत्खननात आढळलेली रोमन समुद्रदेवता पोसायडनची मूर्ती आजही कोल्हापूरच्या टाउन बागेतील पुरातत्व संग्रहालयात आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी दिली आहे.

 


इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारी संबंध यामुळे प्रकाशात आले आहेत. रोमन समुद्रमार्गे भारतात आले आणि कोकणातून नागपूरपर्यंतच्या पठारी भागात व्यापारासाठी पसरले. त्यामुळे त्यांनी दिशादर्शक म्हणून ही चक्रव्यूहाची रचना केली. जगाच्या दृष्टीने हे नवे संशोधन आहे. या परिसरातील लोकांनी अशा जुन्या पाऊलखुणा नष्ट करू नयेत.
-डॉ. पी.डी. साबळे, विभागप्रमुख, पुरातत्व शाखा
डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट अँड डिमंड युनिव्हर्सिटी, येरवडा, पुणे

Web Title: The Romans came to India from Konkan in the early years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.