उन्हाळ्याची चाहूल! कोकणासह विदर्भही तापणार; फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा, पारा आणखी चढत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 07:10 IST2026-02-14T07:08:27+5:302026-02-14T07:10:55+5:30
मुंबईचा पारा ३२ अंश सेल्सिअसवर : मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी ३२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. समुद्राहून वाहणारे वारे शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्थिर झाले. त्यामुळे तापमान वाढले नाही. मात्र, ठाणे व नवी मुंबईत तापमान ३५ होते.

उन्हाळ्याची चाहूल! कोकणासह विदर्भही तापणार; फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा, पारा आणखी चढत जाणार
मुंबई : उन्हाळा सुरू होण्यास अवकाश असतानाच फेब्रुवारी महिन्यातच बदलत्या हवामानाने राज्यातील काही भागात तापमानवाढीची चाहूल दिली आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये हळूहळू उन्हाचे चटके जाणवू लागले असताना पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण कोकण किनारपट्टीसह विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मॉडेल मार्गदर्शनानुसार, कोकण प्रदेशातील कमाल तापमान पुढील ३ ते ४ दिवस ३४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जाऊ शकते. यात सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही भाग व आजूबाजूच्या परिसरातही अशाच प्रकारे तापमानात वाढ अपेक्षित आहे.
उष्ण वारे ठरले ‘ताप’ दायक
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे हवामानात हा बदल होत आहे.
महाराष्ट्राच्या मध्यभागात तापमानातील हा बदल विशेष जाणवणार नसला, तरी कोकण आणि विदर्भात उन्ह वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल-मे महिन्यांत जाणवणारे उन्हाचे चटके फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच जाणवत आहेत.