'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 19:47 IST2025-09-21T19:46:42+5:302025-09-21T19:47:11+5:30
पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक जीएसटी कपात असल्याचे सांगितले.

'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
CM Devendra Fadnavis on PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित करत उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटी रिफॉर्मची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत असून या बचत महोत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतील. दुकानदार, महिला, शेतकरी आणि गरीब सर्वांना या बचत महोत्सवाचा मोठा फायदा होईल, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटलं.
"आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या जीएसटी रिफॉर्मच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. त्यामुळे भारतीयांच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. इतक्या मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असं जीएसटीचे रीडक्शन हे पंतप्रधान मोदी यांनी केले आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"जीएसटीचे सेकंड जनरेशन रीफॉर्म हे या देशातील क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत. कारण त्याच्यावर जीएसटी कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी जीएसटी सुधारणांमुळे देशाला फायदा होणार असल्याचे म्हटलं. "या सुधारणांचे स्वागत पुढील पिढीतील सुधारणा म्हणून करण्यात आले. त्या राष्ट्रीय विकासाला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील, गुंतवणूकदारांना आकर्षित करतील आणि देशाच्या विकासात सर्व राज्ये सहभागी होतील याची खात्री करतील," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताने २०१७ मध्ये जीएसटी लागू केला. त्याचे उद्दिष्ट देशभरात एकसमान कर प्रणाली निर्माण करणे होते. पूर्वी, प्रत्येक राज्याची स्वतःची कर प्रणाली होती, ज्यामुळे व्यवसायिक कामकाज गुंतागुंतीचे होत असे. जीएसटीने त्यांना एकाच करात एकत्रित केले. जीएसटी अंतर्गत चार कर स्लॅब तयार करण्यात आले, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर ५, १२, १८ आणि २८ टक्के असे वेगवेगळे कर आकारले गेले होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आले आहेत.