‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचा प्रस्ताव धूळ खात
By Admin | Updated: June 10, 2016 05:22 IST2016-06-10T05:22:11+5:302016-06-10T05:22:11+5:30
देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून ४२ टक्के अपघात हे व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.

‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचा प्रस्ताव धूळ खात
मुंबई : देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून ४२ टक्के अपघात हे व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. अपघात रोखण्यासाठी वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवण्याची सक्ती सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र राज्यातील सर्व कमर्शियल वाहनांना स्पीड गर्व्हनर बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याची माहिती रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिलचे सदस्य डॉ. कमलजित सोय यांनी दिली.
देशभरात दोन कोटी कमर्शियल वाहने असून महाराष्ट्रात त्यांची संख्या जवळपास २० लाख आहे. वाहन चालक किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि त्याला वाहतुकीच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र कमर्शियल वाहनांवर असलेले चालक हे दहावी पासही नसतात आणि त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालनही काटेकोरपणे केले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यानेच स्पीड गर्व्हनर बसविणे आवश्यक आहे, असे मत सोय यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना स्पीड गर्व्हनर बसविणे बंधनकारक केले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. काही ठराविक राज्ये सोडल्यास इतर राज्यांनी वेग नियंत्रक बसविणे बंधनकारकही केले नसल्याचे सोय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>देशभरात रोज होतात २० हजार अपघात
देशात दरवर्षीय पाच लाख तर रोज २0 हजार अपघात होतात. दहशतवादी हल्ल्यांत १५ वर्षांत ३५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र १५ वर्षांत रस्ते अपघातांत १ लाख ५0 हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात १८ कोटी वाहने असून २८ कोटी लायसन्स आहेत.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २0१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात ४४ हजार ३८२ रस्ते अपघात झाल्याचे समोर आले आहे. १३ हजार ५२९ जणांनी आपले प्राण गमावले, तर ४३ हजार ६६८ जण जखमी झाले. त्यामुळे वेग नियंत्रकांची गरज आहे.