निर्मात्याला न बुडविणारा दिग्दर्शक--बाळ धुरी

By Admin | Updated: March 27, 2015 23:59 IST2015-03-27T22:45:13+5:302015-03-27T23:59:51+5:30

अगणित कथांचा प्रचंड संग्रह--- भालचंद्र कुलकर्णी अनंत माने जन्मशताब्दी विशेष

The producer, who did not immerse the producer - Baby Paddle | निर्मात्याला न बुडविणारा दिग्दर्शक--बाळ धुरी

निर्मात्याला न बुडविणारा दिग्दर्शक--बाळ धुरी

अचूकता आणि नियमितता हे अनंत माने यांचे वैशिष्ट्य. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चित्रपट निर्माण केले, पण एकाही चित्रपटाचे बजेट आणि निर्मात्याला दिलेले वचन त्यांनी कधी ओलांडले नाही. मी त्यांच्या केवळ एकाच चित्रपटात भूमिका केली, पण त्यांच्यातील दिग्दर्शकाने माझ्यातील कलाकार ओळखला होता. अनंत माने यांच्या आठवणी सांगत होते, अभिनेते बाळ धुरी.
बाळ धुरी यांच्या पत्नी जयश्री गडकर. त्यांनी अनंत माने यांच्या अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. अनंत माने यांच्या दिग्दर्शनाचा परीसस्पर्श लाभलेल्या या नायिकेच्या अनंत आठवणी आहेत; परंतु बाळ धुरी यांनी अनंत माने यांच्या ‘पाहुणी’ या एकाच चित्रपटात भूमिका केली. या चित्रपटाच्या वेळच्या आठवणी बाळ धुरी यांनी जागविल्या. या चित्रपटात अनंत माने यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. एक दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्याबद्दल ऐकून होता; पण प्रत्यक्षात त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. त्यांच्यासंदर्भातील काही आठवणी माझ्या मनात कायम आहेत.
मराठी चित्रपटसृष्टी अतिशय कृतघ्न आहे, असे माझे मत बनले आहे. ज्या दिग्दर्शकाने मराठी चित्रपटसृष्टी अक्षरश: जगवली, त्या दिग्दर्शकाच्या हयातीतच त्याची उपेक्षा करण्याचा कृतघ्नपणा झाला आहे. आम्ही सारेच त्याला जबाबदार आहोत. त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्यांच्याबद्दल उदो उदो करून उपयोग काय? अनंत माने यांनी जितके चित्रपट केले, त्या सर्वच चित्रपटांच्या बाबतीत त्यांनी एक पथ्य कायम पाळले, ते म्हणजे कोणत्याही निर्मात्याला बुडवायचे नाही. स्थानिक कलाकार घ्यायचे आणि तंत्रज्ञही स्थानिकच घ्यायचे, हा त्यांचा अट्टाहास असायचा. त्यासाठी ते कोणतीही तडजोड करत नसत. दुसरे म्हणजे त्यांच्या चित्रपटाचा मुहूर्त ज्यादिवशी ठरायचा, त्याच दिवशी ते त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरवायचे.
अशा शिस्तीचा एकही दिग्दर्शक मी आजअखेर पाहिलेला नाही. आम्हा कलाकारांना दिलेला शब्द त्यांनी कधी मोडलेला नाही. दिवसाचे शूटिंग किती वाजता संपेल याचा ते आधीच अंदाज देत आणि ठरलेले मानधनही ते कधी चुकवायचे नाहीत, असा दिग्दर्शक पुन्हा होणे नाही. आजच्या युगात त्यांच्यासारखा माणूस हवा होता.
                                                                                                                             - शब्दांकन : संदीप आडनाईक

अगणित कथांचा प्रचंड संग्रह
कोल्हापूर ते पुणे हा रस्ता तयार करण्याचं रखडलेलं काम बरेच दिवस चाललं होतं. मार्गांवर अनेक अडथळे होते; त्यामुळे कोल्हापूर ते पुणे प्रवास तब्बल ९ ते १० तास चालायचा. प्रवास इतका त्रासाचा आणि दगदगीचा होता की, केव्हा एकदाचं ते पुणं येतंय, असं होऊन जायचं, पण हाच कंटाळवाणा प्रवास अत्यंत सुलभ, सुंदर आणि सुखकर झाला तो अण्णांच्या गोष्टीवेल्हाळ सहवासामुळे.खेबुडकरांचा ‘गावरान मेवा’ पुण्यात धुमधडाक्यात सुरू होता. त्याच प्रयोगासाठी आम्ही काही कलावंत खासगी गाडीने पुण्याला चाललो होतो. नेमक्या त्याच गाडीचं अण्णांचंही बुकिंग होतं. त्यांनी पुढची सीट आरक्षित केली होती; पण ती सीट त्यांनी अन्य कुणाला तरी दिली आणि मागच्या सीटवर आमच्या शेजारी बसले. गाडी सुरू झाली तशा गप्पाही सुरू झाल्या. अर्थात बोलत होते अण्णा. आम्ही श्रवणभक्ती करीत होतो. गप्पांचा विषय अर्थातच मराठी चित्रपटसृष्टी. अनेक अनुभव अण्णांनी सांगितले. ओघात चित्रपट-कथांचाही विषय निघाला. अनेक बाह्यगोष्टींच्या आकषर्णामुळेच विशेषत: तंत्राच्या अतिआहारी गेल्यामुळे कथेकडे कसे दुर्लक्ष होते ते अण्णांंनी परखडपणे सांगितले.
समाजाभिमुख, सरस आणि सकस कथा आणि त्यांचे कलात्मक सादरीकरण हेच यशस्वी चित्रपटाचे यश असते, या मतावर अण्णा अगदी ठाम असत आणि मग उर्वरित प्रवासात अण्णांनी एकामागून एक अशा कथा सांगायला सुरुवात केली. त्या सात-आठ तासांच्या प्रवासात अण्णांनी डझनभर कथा ऐकवल्या असतील. पुणं जवळ येऊ लागलं तसे ते म्हणाले, ‘आता तुम्हाला शेवटची कथा ऐकवतो; पण कथा मी संपूर्ण सांगणार नाही. अर्धी सांगणार आणि त्याचा शेवट तुम्ही मला सांगायचा. मी तुम्हाला आठ-दहा दिवसांची मुदत देतो. शेवट जर आवडला, तर त्याच कथेवर पुढचा चित्रपट असेल आणि जो कथा पूर्ण करील तो माझ्या चित्रपटाचा लेखकही असेल.’ कथासूत्र थोडक्यात असे, ‘१९६१ साली पुण्याच्या पानशेत प्रलयात अनेक संसार घरादारांसह उद्ध्वस्त झाले. नुकतेच लग्न झालेल्या पती-पत्नीवरही या लाटांचा घाव बसला. सुदैवाने पती वाचला. प्रदीर्घ औषधोपचारांनंतर तो बरा झाला. काही दिवस गेल्यानंतर मित्र, नातेवाइकांनी परोपरीनं समजूत घालून दुसरं लग्न करण्याचा त्याला सल्ला दिला. लग्न झालं, त्यानंतरची मधुचंद्राची त्यांची पहिली रात्र. श्रृृंंगार ऐन रंगात आला असताना दारावर टक् टक् होते. विस्मयाने, काहीशा आश्चर्याने पती दार उघडतो. ‘दारात पहिली पत्नी नखशिखांत उभी.’ अण्णा म्हणाले, ‘आता पुढं लिहा.’ आणि त्यांचं ठिकाण आल्यामुळं आमचा निरोप घेऊन ते निघून गेले. गोष्ट पुरी करण्याचं अण्णांचं आव्हान आम्ही काही पेलू शकलो नाही.
                                                                                                                                               - भालचंद्र कुलकर्णी
 

Web Title: The producer, who did not immerse the producer - Baby Paddle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.