सत्ता हे साध्य नसून जनसेवेचे साधन : शिंदे , ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 07:54 IST2024-12-06T07:54:15+5:302024-12-06T07:54:56+5:30
शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपून शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनला भेट दिली. तिथे पत्रकार परिषद घेत त्यांनी मागील अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.

सत्ता हे साध्य नसून जनसेवेचे साधन : शिंदे , ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’
मुंबई : सत्ता हे साध्य नसून ते आमच्यासाठी जनसेवेचे साधन आहे. मागील अडीच वर्षांत आम्ही अशाचप्रकारे काम केले. मला काय मिळाले, यापेक्षा राज्यातील जनतेला काय मिळाले आणि पुढे काय मिळणार, ही भावना मनात ठेवून आम्ही काम केले आणि आता सरकारही त्याच उद्देशाने स्थापन केल्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपून शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनला भेट दिली. तिथे पत्रकार परिषद घेत त्यांनी मागील अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.
मी मुख्यमंत्री म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजायचो. पदापेक्षा मी कामाला महत्त्व दिले. आता मी उपमुख्यमंत्री आहे. आता माझी जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची आहे. आता ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असे मी समजतो. मला मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस आणि अजित पवारांनी सहकार्य केले, तसे आता उपमुख्यमंत्री म्हणून मी फडणवीसांना संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देणार असून, राज्याला पुढे नेण्यासाठी जी मेहनत करायची आहे त्यात आम्ही कमी पडणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून वाटचाल यशस्वी ठरो, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आम्ही अडीच वर्षांत सर्वसामान्यांना समृद्धी देण्याचा प्रयत्न केला
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे हिंदुत्वाचे सरकार आणि सर्वांना न्याय देणारे सरकार अडीच वर्षांचे ठरले. आम्ही अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी देण्याचा प्रयत्न केला.
राज्याचे अडीच वर्ष नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.
गेल्या अडीच वर्षात राज्यात आणि देशात एकाच विचारांचे सरकार असल्याने केंद्रानेही भरभरून सहकार्य केले. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद देतो, असेही ते यावेळी म्हणाले.
‘न भूतो न भविष्यती’
गेल्या अडीच वर्षात ’न भूतो न भविष्यती’ काम केले, त्याची इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली.
प्रत्येक घटक पाठीशी
राज्यातील लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ असे प्रत्येक घटक या निवडणुकीत आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आम्हाला अद्भूत असे बहुमत मिळाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.