'रस्ता नसल्याने बाळ दगावल्याचा संताप'; बोथ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, प्रशासन हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:40 IST2026-02-07T13:39:20+5:302026-02-07T13:40:09+5:30
प्रशासनाची मनधरणी अपयशी! दुपारी १ वाजेपर्यंत बोथच्या मतदान केंद्रावर 'झिरो' टक्के मतदान.

'रस्ता नसल्याने बाळ दगावल्याचा संताप'; बोथ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, प्रशासन हतबल
रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (जि. परभणी): स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा होत असतानाच, परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ आणि बोथतांडा या गावांनी व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. रस्ता आणि पुलाअभावी अनेक वर्षांपासून हाल सोसणाऱ्या या ४६६ मतदारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर पूर्णतः बहिष्कार टाकला असून, शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत एकही मतदान झाले नसल्याचे समोर आले आहे.
बाळ दगावल्याची जखम ठरली निमित्त
ग्रामस्थांच्या या टोकाच्या निर्णयामागे एक अतिशय हृदयद्रावक घटना आहे. मागील आठवड्यात गावात रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला बैलगाडीने दवाखान्यात नेले जात होते. मात्र, प्रवासातील विलंबामुळे आणि खडतर रस्त्यामुळे त्या माऊलीचे बाळ दगावले. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी "आम्ही ईश्वर साक्ष शपथ घेतो की, रस्ता व पूल होईपर्यंत मतदान करणार नाही," असा पवित्रा घेतला आहे.
प्रशासनाची शिष्टाई अपयशी
घटनेचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी रात्री उशिरा गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी गावाची भेट घेऊन ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच शिवकांता आघाव, सुधीर आघाव आणि सचिन राठोड यांच्यासह सर्व ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. करपरा नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो, यामुळे शाळा आणि रुग्णांचे हाल होतात, ही चीड ग्रामस्थांमध्ये उघडपणे दिसत आहे.
१ वाजेपर्यंत कोणीच फिरकले नाही
दुपारी १ वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. २१२ महिला आणि २५४ पुरुष मतदारांनी लोकशाहीच्या प्रक्रियेपेक्षा आपल्या मूलभूत गरजांसाठी दिलेला हा लढा सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.