लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी (जि. पुणे) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. साधारण रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास पालखी मंदिराच्या मुख्य महाद्वारातून प्रदक्षिणासाठी बाहेर पडेल.
आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. सुमारे तीन ते चार लाखांहून अधिक भाविक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
आळंदीत हरिनामासह ‘ज्ञानोबा तुकारामांचा’ अखंड जयघोष सुरू आहे. येथील इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेता पोलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात एक हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
कोणत्या दिवशी कुठे पोहोचणार?१९ जून- आळंदीतून प्रस्थान२० व २१ जून- पुणे२२ जून व २३ जून- सासवड२४ जून- जेजुरी२५ जून- वाल्हे२६ जून- लोणंद२७ जून- तरडगाव२८ जून- फलटण२९ जून- बरड३० जून- नातेपुते१ जुलै- माळशिरस२ जुलै- वेळापूर३ जुलै- भंडीशेगाव४ जुलै- वाखरी५ जुलै- पंढरपूर
पहिला मुक्काम आजोळघरातगुरुवारची नित्यनियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी प्रस्थान होईल. टाळ-मृदुंगाच्या निनादात मंदिर व शहर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम होईल.
पालखी सोहळ्यातील प्रमुख टप्पे - नीरा येथे नीरा नदीत पादुका स्नान - चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण - पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण- खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण- ठाकरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण - बाजीरावची विहीर येथे चौथे गोल आणि दुसरे उभे रिंगण - वाखरी येथे तिसरे उभे रिंगण