पाचपुते यांना अपशब्द वापरले नाहीत
By Admin | Updated: August 16, 2014 02:10 IST2014-08-16T02:10:40+5:302014-08-16T02:10:40+5:30
पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर नाराजी व्यक्त करत आ़ बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़

पाचपुते यांना अपशब्द वापरले नाहीत
अहमदनगर : पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर नाराजी व्यक्त करत आ़ बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ पाचपुते यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून त्यांच्याविषयी आपण एकही अपशब्द वापरला नसल्याचे पिचड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले़
नगर येथील पोलीस मैदानावर पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पिचड म्हणाले, माझे सहकारी बबनराव पाचपुते यांनी दूरध्वनीवरून शिव्या दिल्याचा आरोप केलेला आहे़ या आरोपात काहीही तथ्य नाही़ मी पाचपुते यांना फोन केला नाही़ त्यांनी फोन केला असता मी त्यांना विचारले की, आपण धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा दिला असल्याचे वर्तमानपत्रातून समजले़ आपणही अदिवासी खात्याचे मंत्री राहिलेले आहात़ त्यामुळे आपल्याला आदिवासींच्या जीवनाची सर्व माहिती असताना तुम्ही हा पाठिंबा कसा काय दिला? तुम्ही हा पाठिंबा देऊन आदिवासी जनतेची घोर प्रतारणा केली, असे तुम्हाला वाटत नाही का? हे मी त्यांना दूरध्वनीवरून बोललो़ कारण आदिवासी जमातीतील माणसं सुसंस्कृत आहेत़ खोटे बोलणे, चोरी करणे, ही आदिवासी जमातीची वैशिष्ट्ये नाहीत, असे पिचड यांनी या वेळी सांगितले.
धनगर समाजास पाचपुते पाठिंबा देतात़ मात्र आदिवासी समाजाची कोणतीही वैशिष्ट्ये धनगर समाज पूर्ण करू शकत नाही़ त्यामुळे धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करता येणार नाही, असे पाचपुते यांनी आ़ प्रकाश शेंडगे, भाऊसाहेब वाघचौरे, भावना गवळी, सुधीर मुनगंटीवार, हंसराज आहिर, प्रतापराव जाधव, प्रतापराव सोनवणे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे़ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपले पांडुरंग आहेत, असे सांगणारे पाचपुते उपेक्षित कसे, असा सवालही पिचड यांनी या वेळी उपस्थित केला़ (प्रतिनिधी)