नेट प्रकल्पात एक लाख मोबाइल टॉवर, केंद्रीय मंत्री सिंधिया यांची माहिती, चार आठवड्यात अहवाल देण्याचे दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:26 IST2025-04-02T06:25:17+5:302025-04-02T06:26:02+5:30
Maharashtra News: देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प टप्पा २मध्ये फोर जी नेटवर्कचे जाळे उभारणार असून, अतिदुर्गम भागातही वेगवान नेटवर्क मिळेल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.

नेट प्रकल्पात एक लाख मोबाइल टॉवर, केंद्रीय मंत्री सिंधिया यांची माहिती, चार आठवड्यात अहवाल देण्याचे दिले निर्देश
मुंबई - देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प टप्पा २मध्ये फोर जी नेटवर्कचे जाळे उभारणार असून, अतिदुर्गम भागातही वेगवान नेटवर्क मिळेल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.
सह्याद्री अतिथिगृह येथे मुंबईतील बीएसएनएलच्या मालमत्ता, संपर्क यंत्रणांबाबत मंगळवारी बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय दूरसंचार सचिव नीरजकुमार, बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रावी उपस्थित होते. बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्तांबाबत नगरविकास विभाग, बृहन्मुंबई महापालिका आणि केंद्रीय दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्याच्या सूचना दिल्या.
अतिदुर्गम भागात चांगली संपर्क यंत्रणा निर्माण होईल
भारत नेट टप्पा-२ अंतर्गत फोर जी नेटवर्कचे देशभरात एक लाख टॉवर उभारण्यात येणार आहेत. हे टॉवर प्रामुख्याने संपर्क नसलेल्या भागात उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे राज्यात अतिदुर्गम भागातही चांगली संपर्क यंत्रणा निर्माण होईल, असे सिंधिया म्हणाले. राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्य शासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
एमटीएनएलच्या जागांवर सोयीसुविधा : फडणवीस
- बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तांवर असलेली आरक्षणे आणि उद्देश तपासून घेण्यात येतील. त्यांपैकी नियमानुसार जी आरक्षणे काढणे शक्य आहे, ती काढण्याची कार्यवाही केली जाई.
- या मालमत्तांवर नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. याबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य शासन कार्यवाही करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
- बैठकीत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्ता, मोबाईल टॉवर उभारणी, प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारत नेटच्या अंतर्गत निर्माण होणारी संपर्क यंत्रणा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.