ऑनलाइन टीम
पुणे, दि. ३० - आंबेगाव तालुक्यातल्या माळीण येथील दुर्घटनेत २०० जण गाडले गेल्याची भीती असून केवळ नशीबानं रात्रपाळीमुळे घरी नसलेल्या एका तरुणाचा जीव बचावल्याची घटना समोर आली आहे. विकास लेंभे असे या तरुणाचे नाव आहेस मात्र घरातली नऊ माणसे ढिगा-याखाली गाडली गेल्याने विकासवर दु:खाचे आकाश कोसळले आहे. विकास हा घोडेगाव येथे कामास असून काल रात्रपाळी असल्याने तो घरी नव्हता.
आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे काल रात्री ३० ते ३५ घरांवर डोंगरकडा कोसळला आणि जवळपास २०० माणसे गाडली गेल्याचे दुर्घटना स्थळी सर्वात अगोदर पोहचलेल्या जयसिंग एरंडे यांनी सांगितले. माळीण भागातील भ्रमणध्वनू व्यवस्था पुर्णपणे ठप्प होती, त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी घटनेची माहिती घोडेगाव येथे दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने लगेचच धाव घेतली. एरंडे लागलीच माळीणकडे निघाले, सकाळी १०:३० च्या सुमारास ते तेथे पोहचले. त्यावेळी भयंकर घटना दिसुन आली. तालुक्याचे तहसीलदार तसेच चार पोलीस कर्मचारी मदतीसाठी आले होते. माळीण गाव जवळ जवळ मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले अशी माहिती एरंडे यांनी दिली. दगड, मातीचे ढिगारे काही घरांच्यावर आले होते. जे ग्रामस्थ सकाळी लवकर घराबाहेर पडले अथवा जे जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते ते सुदैवाने वाचले. गावातील शाळा तसेच बाजुची दोन चार घरे तेवढी वाचली.
एरंडे व उपस्थितांनी चार मृतदेह बाहेर काढले त्यामध्ये १ वृध्द व १० वर्षांच्या मुलीचा समावेष होता. दोन जनावरेही त्यांनी ओढून काढली. या घटनेत कुटूंब च्या कुटूंब गाडली गेली आहेत. विकास लेंभे हा घोडेगाव येथे कामास असुन रात्री तो नाईट ड्युटीवर असल्याने तो बालंबाल वाचला,मात्र त्याच्या घरातील ९ माणसे या ढिगाऱ्याखाली गाडल्याने त्याने टाहो फोडला. एरंडे यांनी त्याची समजुत काढून सांत्वन केले. दरम्यान या दुर्घटनेत मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती एरंडे यांनी व्यक्त केली.