Rohit Pawar Shared Manikrao Kokate Video While Playing Rummy Game: नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाले. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजले. संजय गायकवाड यांनी कँटिन कर्मचाराऱ्याला केलेली मारहाण, संजय शिरसाट यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ तसेच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनात झालेली हाणामारी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरूनही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या काही विधानांवरूनही वाद निर्माण झाला होता. यातच आता मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या एका विधानाचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाइलमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. यावरून रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. माणिकराव कोकाटे या व्हिडिओत मोबाइलवर पत्ते खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ विधिमंडळ अधिवेशनातील आहे, असे म्हटले जात आहे.
कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. तसेच “#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या, असे हॅशटॅगही दिले आहेत.
दरम्यान, वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कसलीच चर्चा नसल्याने असे विलिनीकरण वगैरे कोसो दूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पण, असा काही निर्णय करायचा झाला तरी त्याबाबत भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल. भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे विलिनीकरणाचे काही निर्णय घ्यायचे झाल्यास त्याची कल्पनाही भाजपाच्या नेत्यांना द्यावी लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले होते. हा धागा पकडून रोहित पवार यांनी आता मंत्री माणिकराव कोकाटे, अजित पवार गट आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला.