“अमित शाह यांनी बीड, परभणीवर बोलायला हवे होते”; शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:56 IST2025-01-13T14:55:09+5:302025-01-13T14:56:44+5:30

NCP SP Group MP Supriya Sule News:

ncp sp group mp supriya sule replied bjp amit shah over criticism on sharad pawar | “अमित शाह यांनी बीड, परभणीवर बोलायला हवे होते”; शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

“अमित शाह यांनी बीड, परभणीवर बोलायला हवे होते”; शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

NCP SP Group MP Supriya Sule News: आताच्या घडीला राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण नवी वळणे घेत असून, नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. हे प्रकरण विरोधकांनी चांगलेच लावून धरले असून, आरोप-प्रत्यारोप तीव्र होत आहे. यातच ठाकरे गटाने दिलेला स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीतील धुसपूस यांमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. भाजपाचे शिर्डीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह यांनी केलेल्या या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत पलटवार केला आहे. 

मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एवढे यश त्यांना मिळाले असले तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावे लागत आहे. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड येथील संतोष देशमुख प्रकरणावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता, असे खोचक प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.

अन्याय, अत्याचार होत असताना गप्प बसायचे का? 

बीड प्रकरणात आम्ही राजकारण आणलेले नाही, आणणार नाही. वाल्मीक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांनी हे दाखवले आहे. सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळ्यांनीच या गोष्टी सांगितल्या. आम्ही वाल्मीक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे अन्याय, अत्याचार होत असताना गप्प बसायचे का? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली. 

दरम्यान, १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण सुरू केले, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडले होते. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. 
 

Web Title: ncp sp group mp supriya sule replied bjp amit shah over criticism on sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.