Rohit Pawar Social Post About Ajit Pawar Sad Demise: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी मुखाग्नी दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खा. सुप्रिया पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी अश्रू ढाळत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी खासदार, आमदारांसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर आता रोहित पवारांनी काका अजित पवार यांच्यासाठी अत्यंत भावुक पोस्ट लिहिली आहे.
'दादा... आम्हाला सोडून जाऊ नका... परत या!' या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामती अक्षरशः अश्रूंनी न्हाऊन निघाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी आणि अंत्ययात्रेसाठी बारामतीत जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच बारामतीच्या रस्त्यांवर शांतता पसरली होती. दुकानांचे शटर खाली, रस्त्यांवर सन्नाटा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोकभाव होते. अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच नागरिक, कार्यकर्ते, महिला, वृद्ध, युवक मोठ्या संख्येने दाखल झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर 'अजितदादा अमर रहे', ही एकच हाक होती. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर दीर्घ पोस्ट लिहून भावनांना वाट मोकळी करून दिली. नेमके काय म्हणाले रोहित पवार?
दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय
मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.
पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’
अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.
दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’
दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय.. Love U दादा!
Web Summary : Rohit Pawar penned a heartfelt tribute to Ajit Pawar after his demise. Baramati bid a tearful farewell. Rohit reminisced about Ajit Pawar's work ethic, accessibility, and impact, expressing disbelief and grief over his sudden passing.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद रोहित पवार ने उन्हें श्रद्धांजलि दी। बारामती ने अश्रुपूर्ण विदाई दी। रोहित ने अजित पवार की कार्यशैली, पहुंच और प्रभाव को याद किया, और उनके अचानक निधन पर अविश्वास और दुख व्यक्त किया।