“तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये”; एकनाथ खडसेंनी फडणवीसांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 16:26 IST2023-08-11T16:25:49+5:302023-08-11T16:26:53+5:30

महाराष्ट्रातील माझी विश्वासहार्यता अजून संपलेली नाही. जनतेला माझ्यावर विश्वास आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.

ncp eknath khadse criticised bjp dcm devendra fadnavis | “तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये”; एकनाथ खडसेंनी फडणवीसांना सुनावले

“तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये”; एकनाथ खडसेंनी फडणवीसांना सुनावले

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजप नेत्यांकडून पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचे समर्थन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी पंतप्रधान मोदींचे म्हणणे योग्य नाही, असा दावा केला होता. यासंदर्भात पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे. 

गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप – शिवसेनेची युती तुटली त्यावेळेस गिरीश महाजन कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हते. त्या कालखंडातील दिल्लीच्या कोर कमिटीच्या बैठकीला महाजन यांना बोलावले जात नव्हते. भाजपची सूत्र मी विरोधी पक्षनेते असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. त्यामुळे मधल्या कोणत्याच गोष्टी महाजन यांना माहिती नव्हत्या, असे सांगतानाच कमीत कमी माहिती घेऊन त्यांनी बोलायला हवे, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केले. ते मीडियाशी बोलत होते. 

तुमची लाचारी दिसून येते, आम्हाला नैतिकता शिकवू नये

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांनी टीका केली. ज्यांना हे कालपर्यंत भ्रष्ट म्हणत होते, नॅशनल करप्ट पार्टी म्हणून म्हणत होते. गिरीश महाजन यांचे नेते त्यांच्यासोबत खुर्चीला खुर्ची लावून बसतात. त्यामुळे आता कुठे नैतिकता राहिली आहे. आम्हाला नैतिकता शिकवू नये. करप्ट पार्टीसोबत तुम्ही युती करून जवळ आलात. त्यामुळे महाराष्ट्रातील तुमची लाचारी दिसून येते, अशी घणाघाती टीका एकनाथ खडसे यांनी केली. तसेच सुधीर मुनगंटीवार यांना अर्धवट माहिती आहे. शिवसेनेने जागा वाढवून द्या अशी मागणी केलेलीच नव्हती. कारण शिवसेनेकडे १७१ जागा होत्या. भाजपाच्या ११७ जागा होत्या. त्यावेळी वातावरण आपल्या बाजूला आहे, असे भाजपला वाटले. त्यामुळे युतीत जागा वाटपाची चर्चा करताना भाजपने १४५ जागांची मागणी केली. पण काही जागा देण्यास शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे युतीत तणाव झाला. भाजपलाही तेच हवे होते. कारण स्वबळावर लढण्याची भाजपची रणनीती आधीच ठरलेली होती. या रणनीतीत मीही सहभागी होतो. त्यानंतर सर्वानुमते युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे खडसे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील माझी विश्वासहार्यता अजून संपलेली नाही. जनतेला माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ दिलेला नाही. कापसाला भाव देईन, जळगावचा विकास करेल अशी आश्वासने मी काही दिली नाही, अशी खोचक टिप्पणी एकनाथ खडसे यांनी केली.

 

Web Title: ncp eknath khadse criticised bjp dcm devendra fadnavis