संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:29 IST2026-04-11T13:21:06+5:302026-04-11T13:29:14+5:30
ऐतिहासिक वस्तूस्थिती असतानाही मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वस्तुस्थिती असतानाही मराठा अभ्यासक्रमातून हटवणे म्हणजे जाणीवपूर्वक इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे.

संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
सातारा - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या तेजस्वी परंपरेचा जिवंत वारसा आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा वृषालीराजे भोसले यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याने दिल्लीच्या राजकारणावर आपली पकड घट्ट केली होती. मराठ्यांचा पराक्रम केवळ सह्याद्रीपुरता मर्यादित न राहता थेट अटकेपार पोहचला होता. राजस्थानातील रामपुरा मोहीम, बुंदीतील राजकीय हस्तक्षेप, कक्कोरचे घनघोर युद्ध आणि पाटण, तसेच मेर्टा येथील ऐतिहासिक विजय हे मराठ्यांच्या अजेय युद्धनीतीचे पुरावे आहेत. अनेक राजपूत राज्यांनी त्यावेळी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते. ही ऐतिहासिक वस्तूस्थिती असतानाही मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वस्तुस्थिती असतानाही मराठा अभ्यासक्रमातून हटवणे म्हणजे जाणीवपूर्वक इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे.
इतिहास हा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाखाली बदलला जाऊ नये. तो पुराव्यांच्या आधारे जसाच्या तसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मराठ्यांच्या उत्तरेतील प्रभावाचा पुरावा देणारा नकाशा वगळणे हे ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करण्यासारखे आहे. आम्ही वैयक्तिकरित्या तसेच छत्रपती घराण्याच्या वतीने या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. सध्या आम्ही यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासत आहोत. त्यानंतर पुढे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. हा केवळ इतिहास नाही आमचा स्वाभिमान आहे आणि त्याचे रक्षण आम्ही नक्की करू असं वृषालीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.