"गॅस टंचाईमुळे राज्यात चूल विझण्याची वेळ, सरकारने दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:18 IST2026-03-11T14:16:48+5:302026-03-11T14:18:46+5:30
Vijay Vadettiwar on Natural Gas Shortage: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

"गॅस टंचाईमुळे राज्यात चूल विझण्याची वेळ, सरकारने दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी"
Vijay Vadettiwar on Natural Gas Shortage: राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
राज्यातील सद्यस्थिती मांडताना वडेट्टीवार म्हणाले, "काल विधानसभेचे कामकाज रात्री एक वाजेपर्यंत सुरू असताना कँटीन बंद होते. बाहेरील हॉटेल्स गॅसअभावी बंद आहेत. मुंबई आणि नागपूरमधील सुमारे ३०% हॉटेल्स गॅस तुटवड्यामुळे बंद ठेवण्यात आली आहे. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे. गॅस टंचाईच्या निषेधार्थ कोल्हापूर आणि विदर्भासह राज्यभरात आंदोलने सुरू झाली आहेत. महिला भगिनींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अधिवेशन सुरू असतानाच हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे सरकारने हा पुरवठ्याबाबत परिस्थिती सांगितली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
"गॅसच्या तुटवड्यामुळे काळाबाजार वाढण्याची भीती असून, काल HPC ची १८ लाख रुपयांच्या सिलिंडरची गाडी चोरीला जाण्याची घटना घडली आहे. ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने भयावह स्थिती आहे. युद्धजन्य परिस्थिती किंवा जागतिक कारणांमुळे पुरवठा विस्कळीत झाला असेल, तर सरकारने सध्या साठा किती उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे याचे निवेदन सभागृहात केले पाहिजे," अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
अध्यक्षांनी यावर निर्देश देताना सांगितले की, हा विषय केंद्राशी संबंधित असला तरी राज्य सरकार जनतेच्या हितासाठी सर्व उचित उपाययोजना करेल.