नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:22 IST2025-06-02T08:21:59+5:302025-06-02T08:22:34+5:30

शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार

Nagpur-Mumbai direct travel Samruddhi Mahamarg from June 5 Time has come for the inauguration of the last phase | नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास गुरुवार, ५ जूनपासून करणे आता शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी येथील सोहळ्यात लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने ७०१ किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील ६२५ किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला झाला आहे. आता गुरुवारपासून शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर आठ तासांत पोहोचता येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते.

पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही....

  • 'एमएसआरडीसी'ने या महामार्गाच्या लोकार्पणासाठी एप्रिलमध्ये राज्य सरकारकडे वेळ मागितली होती. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता.
  • तेव्हाच्या नियोजनानुसार शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी प्रवासासाठी खुला केला जाणार होता. त्यादृष्टीने 'एमएसआरडीसी'ने हालचालीही सुरू केल्या होत्या.
  • मात्र, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे या मार्गाचे उद्घाटन लांबणीवर पडले.


महामार्गाचे आतापर्यंतचे टप्पे

  • समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला झाला होता. तर, दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर, असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
  • तर, गेल्यावर्षी वर्षी तिसऱ्या टप्प्यात 'एमएसआरडीसी'ने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किलोमीटरचा मार्ग सुरू केला. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत.
  • या बोगद्यांच्या भागात रेखाटली चित्रे
  • इगतपुरी ते आमने या ७६ किलोमीटरच्या डोंगराळ भागात 'समृद्धी'वर पाच बोगदे आहेत. त्यांची एकत्रित लांबी ११ किमी असून, त्यात इगतपुरी येथील ७.७८ किमीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदाही आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आता आठ मिनिटांमध्ये पार करता येईल.

Web Title: Nagpur-Mumbai direct travel Samruddhi Mahamarg from June 5 Time has come for the inauguration of the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.