रश्मी ठाकरेंना जेलमध्ये टाकलं जाईल तेव्हा विचारेन आता कसं वाटतंय?; नवनीत राणांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:40 IST2022-05-28T17:40:24+5:302022-05-28T17:40:51+5:30
कुणाचं हिंदुत्व असली आणि नकली आहे हे शिवसेना ठरवू शकत नाही असं नवनीत राणांनी म्हटलं आहे.

रश्मी ठाकरेंना जेलमध्ये टाकलं जाईल तेव्हा विचारेन आता कसं वाटतंय?; नवनीत राणांचा निशाणा
नागपूर - आपले मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत. ते राज्याला कुठल्या दिशेला घेऊन जाणार? जर कोणी गुन्हा नसताना उगाच जेलमध्ये टाकत असेल तर ते योग्य नाही. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सत्तेचा दुरुपयोग केला. केवळ हनुमान चालीसा पठण करण्यास सांगितले म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं. परंतु यापुढे त्यांच्या हातात सत्ता नसेल आणि रश्मी ठाकरेंना जेलमध्ये टाकलं तर त्यांना विचारेन आता कसं वाटतंय? असा टोला खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
नवनीत राणा(Navneet Rana) म्हणाल्या की, कुणाचं हिंदुत्व असली आणि नकली आहे हे शिवसेना ठरवू शकत नाही. असली-नकलीवरून वाद त्यांच्याकडेच होत आहेत. लोकसभेत धार्मिक नारे देऊ नये कारण ती जागा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. हिंदुत्वाचा अजेंडा भाजपाचा नाही. हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येक हिंदूंचा आहे. इतकी वर्ष भाजपा हिंदुत्वाचा अजेंडावर काम करत आहे. मग जो मंदिरात जातो तो भाजपाच्या अजेंड्यावर काम करत असं थोडी असतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
तसेच गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना रोजगार दिले. शेतकऱ्यांचे हात बळकट केले. विकासाचं राजकारण केले. एकही विभाग असा नाही जो तोट्यात चालला होता. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मी आणि माझे पती आमदार रवी राणा ९ दिवस जेलमध्ये होतो. वीज दरात सूट मिळावी म्हणून आम्ही आंदोलन केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बेरोजगारीवर बोलत नाही. शेतकऱ्यांवर बोलत नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
दरम्यान, मागील २ वर्षापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाही. कोविड काळात पंतप्रधान, गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस, लोकप्रतिनिधी जमिनीवर उतरून काम करत होते. हॉस्पिटलला जात होते. लोकांच्या समस्या सोडवल्या जात होत्या असं सांगत बाळासाहेबांनंतर एकही शिवसैनिक असा नाही जो स्टेजवर उभं राहून हिंदुत्वाबाबत स्पष्ट बोलेल. बाळासाहेबांचे विचार कुठे गेले? असा सवाल नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.