STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:31 IST2025-12-10T19:29:02+5:302025-12-10T19:31:27+5:30
Pratap Sarnaik News: जनतेचे हित जास्त महत्त्वाचे आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे उलट एसटी महामंडळाला नुकसानच सहन करावे लागते, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
Pratap Sarnaik News: एसटी बसची सेवा ही कुठल्याही प्रकारच्या फायद्यासाठी चालविली जात नाही. शासनाच्या विविध योजनांमुळे उलट महामंडळाला नुकसानच सहन करावे लागते. मात्र जनतेचे हित जास्त महत्त्वाचे आहे. एससटीवर चार हजार १९० कोटी रुपये देण्यांचा आर्थिक भार आहे. एसटी आगारांच्या मालमत्ता विकसित करून देणी सहा-आठ महिन्यांमध्ये फेडली जातील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटीने थकविलेली कामगारांची देणी आणि सरकारकडून होत असलेली आर्थिक तरतूद यासंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला प्रताप सरनाईक यांनी उत्तर देताना सांगितले की, एसटीची आगारे विकसित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून त्यातून आणि उत्पनाच्या अन्य पर्यायांमधून निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून ही देणी फेडली जातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेऊन यंदा प्रथमच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस जाहीर केला. दिवाळी भेट व अग्रीमसाठी शासनाने निधी दिला, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
वर्षभरात ८ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार
राज्यातील परिवहन व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी वर्षभरात ८ हजार नवीन एसटी बसेस घेण्यात येणार आहेत. तीन हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या वर्षात उर्वरित बसेसची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येईल. २०४७ पर्यंत डिझेलवरील सर्व बसेसची जागा इलेक्ट्रिक बस घेतील. तसेच दोन महिन्यांत राज्यातील २१६ एसटी डेपोच्या विकासाची प्रक्रिया सुरू होईल. पीपीपी मॉडेलअंतर्गत हा विकास होईल. २०२९ पर्यंत राज्यातील सर्व एसटी डेपोंचा कायापालट करण्यात येईल, असेही सरनाईक म्हणाले.
दरम्यान, एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. कामगारांना डबल शिफ्ट करावी लागते. मात्र तात्पुरत्या पद्धतीवर अडीच हजार चालक घेण्यात येतील व लवकरच कायमस्वरुपी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. पुरवणी मागण्यांमध्येदेखील महामंडळाला २ हजार ८९३ कोटी रुपये मिळणार आहे. त्यातील बहुतांश निधी कामगारांचे वेतन व थकीत देयके अदा करण्यासाठी वापरण्यात येईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.