गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:02 IST2021-10-29T14:00:35+5:302021-10-29T14:02:54+5:30
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी; भामरागढ एरिया कमिटीचं पत्र

गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र
ठाणे: ठाणे तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालकमंत्री शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीच्या नावाने आलेल्या या पत्रात 'तुम्ही गडचिरोलीचा खूप विकास करत आहात. पण आम्हाला मोठी समस्या निर्माण करत आहात. पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. याचा आम्ही नक्कीच बदला घेऊ,' अशा धमकीचे पत्र ठाण्यातील लुईसवाडीतील नंदनवन या शिंदे यांच्या निवासस्थानी आठ दिवसांपूर्वी आल्याची माहिती सुत्रांनी दिली. गडचिरोली पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे हे ठाण्याप्रमाणेच गडचिरोलीचेदेखील पालकमंत्री आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकासकामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सुत्रांनी सांगितले. याच नाराजीतून त्यांना हे पत्र आल्याचे बोलले जात आहे.
हे धमकीचे पत्र मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावरही पाठवण्यात आले होते. त्या संदर्भात मुंबईतील पोलिस तपास करत असून ठाण्यातदेखील हे पत्र कोणी पाठवले या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या पत्रावाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता, यावर नंतर प्रतिक्रिया देईन, असे सांगत ते कोल्हापूर दौऱ्याला निघून गेले.