मुंबईकरांना जेवढा त्रास, तेवढाच आम्हाला होतोय; जरांगेंचे सीएम, दोन उपमुख्यमंत्र्यांना अखेरचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:53 IST2024-01-25T14:52:57+5:302024-01-25T14:53:47+5:30
Maratha Morcha Latest Update from Lonavala: मनोज जरांगे पाटलांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.

मुंबईकरांना जेवढा त्रास, तेवढाच आम्हाला होतोय; जरांगेंचे सीएम, दोन उपमुख्यमंत्र्यांना अखेरचे आवाहन
सरकारचे शिष्टमंडळ आले नव्हते, अधिकारी होते. ते समाजाच्या लोकांसमोर येण्यास घाबरत होते. म्हणून जेवता जेवता बोलू असे म्हणत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मोठे शिष्टमंडळ येत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी बंद दाराआड चर्चेवरील चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.
मनोज जरांगे पाटलांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना आता तुम्हीच या, लक्ष घाला असे अखेरचे आवाहन केले आहे. आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो, मार्ग निघावा यासाठी. या तिघांपैकी एकाने तरी यावे आणि तोडगा काढावा असे जरांगे पाटील म्हणाले. मला ही विनंती करायची नव्हती, परंतु ती माझ्या समाजासाठी करायची आहे. मुंबईत यायची हौस नाहीय, परंतु जर तिथे जे प्रश्न सुटतील ते इकडेच सुटले तर आम्हाला मुंबईत यावे लागणार नाही, असे जरांगे म्हणाले.
तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना आपण आता मुंबईला आझाद मैदानावर निघाल्याचे म्हटले आहे. आझाद मैदानावर परवानगी मिळाली आहे. मंडप उभारण्याचे कामही सुरु झाले आहे. माझे आताच तेथील लोकांशी बोलणे झाले आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.