शहिदांच्या भूमीत मराठ्यांची वज्रमूठ
By Admin | Updated: September 26, 2016 17:08 IST2016-09-26T17:08:34+5:302016-09-26T17:08:34+5:30
कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध करीत आणि असंतोषाचा आक्रोश मौनातून व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा लाखोंचा जनसागर पोहचला

शहिदांच्या भूमीत मराठ्यांची वज्रमूठ
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 26 - बाल शहिदांच्या भूमीत सोमवारी मराठा समाजाचा जनसागर उसळला. कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध करीत आणि असंतोषाचा आक्रोश मौनातून व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा लाखोंचा जनसागर पोहचला. मोर्चातील जिजाऊच्या सहा लेकींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्यातील नराधामांना तातडीने शिक्षा करण्यासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवार, २६ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच हजारो समाजबांधव विविध वाहनांनी नंदुरबारात दाखल होत होते. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास सहा तरुणींनी पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चातील मार्गावर असलेल्या पालिकेतील शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळला, पंडित नेहरू, म.गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोर्चाचे पहिले टोक ते शेवटचे टोक असे जवळपास अडीच ते तीन किलोमिटरचे लांब अंतर होते. मोर्चेकरी महिला, तरुण, तरुणी, वृद्ध यांच्या हातात निषेधाचे काळे झेंडे, भगवे झेंडे, विविध घोषणा लिहिलेले फलक होते.
नि:शब्द हुंकार व्यक्त करीत दुपारी दोन वाजता मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. अडीच वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सहा तरुणींनी निवेदन दिले. त्यानंतर पावणेतीन वाजता आठ फूट उंचीच्या व्यासपीठावरून पाच तरुणींनी निवेदन वाचण्यास सुरुवात केली. सर्वात आधी कोपर्डीच्या मुलीची आत्मकथा, नंतर मराठीतून व त्यानंतर अहिराणीतून निवेदनाचे वाचन करण्यात आले. उपस्थितांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.