Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:21 IST2025-06-29T11:19:34+5:302025-06-29T11:21:18+5:30
Manisha Kayande on Eknath Shinde: शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला.

Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागची दोन कारणे सांगितले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण योजनेमुळेच राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले, असे त्या म्हणाल्या.
एका कार्यक्रमात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, "एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही मुख्यमंत्र्यांची चर्चा होते, तेव्हा फक्त एकनाथ शिंदे यांचाच चेहरा समोर येतो. एकनाथ शिंदे हे आताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी शिवसैनिकांसाठी मुख्यमंत्रीच आहेत आणि कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही."
पुढे बोलताना मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागचे दोन कारण सांगितले आहेत. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना यांनी महायुतीच्या विजयाच्या मोलाची भूमिका बजावली, असे मत त्यांनी व्यक्त केले. "एकनाथ शिंदे केवळ भाषणच देत नाही तर चांगली कामगिरीही करतात. त्यामुळे बरेच लोक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत", असे त्या म्हणाल्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या २३० जागांमध्ये भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागांवर विजय मिळवण्यात यश आले. तर काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत.