महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:01 IST2025-06-06T11:00:39+5:302025-06-06T11:01:08+5:30

मुंबई-नाशिक प्रवास आता अधिक सुखकर आणि जलद; मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण

Maharashtra's 'prosperity': Igatpuri-Kasara distance in 8 minutes through the country's widest tunnel | महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत

महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, समृद्धी महामार्गावरून (इगतपुरी): सह्याद्रीची पर्वतरांग खोदून भारतातील सर्वाधिक रुंदीचा आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते कसारा दरम्यान उभारण्यात आला आहे. या बोगद्याची लांबी ७.७८ किमी असून रुंदी १७.६१ मीटर एवढी आहे, तर उंची ९.१२ मीटर आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर ८ मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार असून कसारा घाटातील कोंडीपासून वाहनांची सुटका होईल.

समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते आमने दरम्यान एकूण ५ दुहेरी बोगदे उभारण्यात आले असून त्यांची एकत्रित लांबी १०.७३ किमी एवढी आहे. त्यातून मुंबई नाशिक ही शहरे अधिक जवळ आली आहेत. या ७६ किमीच्या भागात १७ मोठे पुल उभारण्यात आले असून त्याची एकूण लांबी १०.५६ किमी एवढी आहे. त्यासाठी काही ठिकाणी खडकात ३० ते ४० मीटर खोल खोदकाम केले आहे. दरम्यान या भागात सर्वाधिक २.२८ किमी लांबीचा या महामार्गावरील सर्वात मोठा पूलही एमएसआरडीसीने उभारला आहे. या पुलाच्या काही खांबाची उंची ही बहुमजली इमारतींएवढी म्हणजेच ८४ मीटर एवढी आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिर्डी-मुंबई अधिक जवळ

इगतपपुरी ते आमणे हा मार्ग खुला झाल्याने ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. याशिवाय शिर्डी, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल. त्यातून शेतकऱ्यांच्या वेळेत बचत होऊन शेतमाल अधिक ताजा बाजारात आणण्यास मदत मिळेल.

१२ कोटी बॅग सिमेंटचा वापर

समृद्धी महामार्गाच्या निर्माणासाठी तब्बल १२ कोटी बॅग सिमेंट वापरण्यात आले आहे. तसेच या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासह अभियांत्रिकी नमुना असलेले पूल उभारणीसाठी तब्बल ७ लाख मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले. ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी तब्बल ६१ हजार कोटी रुपये इतका खर्च आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

...असे झाले काम

  • वर्धा, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे जिल्ह्यात साधारण ६० किमी लांबीमध्ये डोंगर कापून महामार्ग
  • कठीण खडकात साधारण ८०० लाख घनमीटर खोदकाम झाले.
  • महामार्गासाठी एकूण साधारण १,३०० लाख घनमीटर माती मुरुम लागला.
  • या महामार्गासाठी ७ लाख मे. टन स्टील वापरण्यात आले.
  • १२ कोटी सिमेंट बॅग्ज लागल्या आहेत.
  • साधारण ६.० कोटी घनमीटर क्रश्ड स्टोन वापरण्यात आला आहे.
  • वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी ८ उन्नत मार्ग व ९२ भुयारी मार्ग.
  • महामार्गावर २०३ मेगावॉट सौरउर्जा निर्मिती होणार असून, त्यातील ३५ मेगावॉटचे काम सुरू झाले आहे.
  • महामार्गासाठी २ लाख ३३ हजार एवढी वृक्षतोड केली, तर नव्याने वृक्षारोपण ३३ लाख ३१ हजार.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘समृद्धी’वर चालविली गाडी, म्हणाले- आम्हाला ड्रायव्हिंग सीटची सवय

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाडीचे स्टिअरिंग स्वतःच्या हाती घेऊन या महामार्गावरून गाडी चालविण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी महामार्गाच्या कामाचीही पाहणी केली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महामार्गावर गाडी थांबविण्यासाठी कुठेही जागा नाही. यावरून गाड्या सुसाट जातील. त्यामुळे निसर्ग सौंदर्य दिसत असले तरी कोणीही गाडी थांबवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. या महामार्गावर उभारण्यात आलेल्या सर्वात लांब भुयारी मार्गाचे आणि आव्हानात्मकरितीने उभारलेल्या पुलांची पाहणीही त्यांनी केली.

अजित पवारांनी सांगितला गाडी चालविण्याचा किस्सा

समृद्धी महामार्गावरून जाताना आधी गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. मी मागे बसलो होतो. गाडी नीट चालते की नाही हे पाहत होतो. गाडी जाताना व्यवस्थित गेली. येताना गाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवली. मी म्हटले हे बाबा गाडीवर बसल्यावर गाडी नीट चालणार नाही. आपण एलसी घेऊ या. निरंजन डावखरे यांची एलसी होती. ती घेतली. फडणवीस यांनी गाडी चालवायला घेतल्यावर आधी तिने १०० चा वेग घेतला. नंतर गाडीने १२० चा वेग घेतला. मी पाहत होतो. टनेल आल्यावर त्यांनी गाडी १०० च्या वेगाने चालविली. अशा रीतीने नियमांचे पालन करत आम्ही सुरक्षित पोहोचलो. त्यामुळे आम्ही उतरवलेल्या विम्याचा कुठेही उपयोग करावा लागला नाही. आमचा प्रवास सुरक्षित आणि समाधानी राहिला. 

Web Title: Maharashtra's 'prosperity': Igatpuri-Kasara distance in 8 minutes through the country's widest tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.