संत, महापुरुषांच्या सन्मानार्थ योजनांची घोषणा, किल्ल्यांचाही विकास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 07:01 IST2026-03-07T07:00:02+5:302026-03-07T07:01:20+5:30
Maharashtra Budget 2026 Cultural Heritage: महाराष्ट्र सरकार साजरे करणार 'सामाजिक समता व समरसता वर्ष'! महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी मोठी तरतूद. वाचा सविस्तर घोषणा.

संत, महापुरुषांच्या सन्मानार्थ योजनांची घोषणा, किल्ल्यांचाही विकास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतींचे विशेष वर्ष लक्षात घेता राज्य सरकार यंदाचे वर्ष हे सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करणार असून त्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले.
महात्मा फुले यांच्या जन्माला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.
संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र
त्यासाठी आवश्यक निधी दिला जाणार आहे. संत गाडगेबाबा यांचे हे १५० वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे.तसेच संत गाडगेबाबा ग्रामसमृद्धी अभियान राबविले जाईल. संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत ७५ गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रकल्प राबविला जाईल.
संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथील जन्मस्थानाचे जतन
महाड (जि. रायगड) येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सुविधांसाठी विकास आराखडा
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथील जन्मस्थानाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विकास आराखडा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचे दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण केले जाईल,
महात्मा फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील कटगुण, (ता. खटाव) या जन्मगावी भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव, (जि. सातारा) या जन्मगावी त्यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र सुरू करणार.
१२ किल्ल्यांचे जतन करण्यासाठी उपाययोजना करणार
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आलेल्या १२ किल्ल्यांचे जतन करण्यासाठी उपाययोजना करणार.
आंबेगाव-बुद्रुक, (ता. हवेली, जि. पुणे) येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला व परिसर विकासासाठी आवश्यक निधी देणार.
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व पानिपतच्या काला अंब येथे मराठा शौर्य स्मारकास आधीच मान्यता, आता जागा निश्चितीसाठी हरयाणा सरकारशी समन्वय.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील भव्य स्मारक जून २०२६ पर्यंत पूर्ण करणार. वढू बुद्रुक येथील समाधिस्थळाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करणार.
संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथील स्मारकाचे काम लवकरच हाती घेणार.
सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचा जीर्णोद्धार करणार.