‘लोकमत साहित्य पुरस्कार’ २०२६ ची घोषणा; दिलीप माजगावकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 10:16 IST2026-03-15T10:15:56+5:302026-03-15T10:16:15+5:30
मुंबई : सन २०२५ मध्ये उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखक, कवींना दिल्या जाणाऱ्या ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’ची घोषणा मुंबईत करण्यात आली. ...

‘लोकमत साहित्य पुरस्कार’ २०२६ ची घोषणा; दिलीप माजगावकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
मुंबई : सन २०२५ मध्ये उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखक, कवींना दिल्या जाणाऱ्या ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’ची घोषणा मुंबईत करण्यात आली. उत्तम साहित्य निर्मिती करणाऱ्या ११ लेखकांना त्यांच्या २०२५ मधील पुस्तकांसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ११ साहित्यिकांना आणि ज्येष्ठ प्रकाशक, राजहंस प्रकाशनचे प्रमुख दिलीप माजगावकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार घोषित झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारांकरिता कादंबरी, कथा, कविता, चरित्र, अनुवाद, दस्तावेज आदी प्रकारांना विचारात घेत उत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्यात आली. पुस्तकांच्या शिफारशी राज्यभरातल्या २५ तज्ज्ञांकडून समितीने मागवल्या हाेत्या. पुरस्कारांच्या निवडीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली होती.
त्यामध्ये लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्यासह ज्येष्ठ लेखक संग्राम गायकवाड, लेखिका अंजली जोशी, यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळ सराफ, पत्रकार व संपादक संतोष शेणई आणि मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. पुरस्कार विजेते लेखक आणि त्यांचे विजेते पुस्तक पुरस्कार सोहळ्यात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते. विजेते लेखक आपल्या वाचकांना पुस्तकावर स्वाक्षरीही देतात. हे या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.
‘राजहंसी मुद्रा’
‘राजहंस प्रकाशना’चे प्रमुख दिलीप माजगावकर यांचे योगदान अनन्य साधारण आहे. देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेले आर. के. लक्ष्मण, थोर नाटककार विजय तेंडुलकर यांच्यापासून विश्वास पाटील आणि अरुण साधू यांच्यापर्यंत अनेक मान्यवर साहित्यिकांची आशयसंपन्न आणि वाचनीय पुस्तके यांच्या संस्थेने संपादित आणि प्रकाशित केलेली आहेत. एक होता कार्व्हर या त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. लेखकांची निवड, विषयातले वैविध्य आणि आकर्षक मांडणी या त्रिवेणी संगमातून आपण मराठी साहित्यावर ‘राजहंसी मुद्रा’ उमटवलेली आहे.