कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आज सहाव्या दिवशीही ठप्पच आहे. मात्र, आज दुपारी पहिला टँकर सोडल्याने लोकांमध्ये महामार्ग सुरू झाल्याचा संभ्रम परसला होता. यामुळे अडकलेल्या लोकांनी वाहनांसह महामार्गाच्या दिशेने कूच केली होती. यामुळे पोलीस अधिक्षकांना खुलासा करावा लागला असून महामार्गावरील पोलीस बंदोबस्तही वाढवावा लागला आहे.
महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू होणार नसून, अत्यावश्यक सेवा बोटीतूनच पुरवण्यात येणार आहे. केवळ इंधनाचे टँकर आणि अॅम्बुलन्सनाच महामार्गावरून वाट करून दिली जाणार आहे. महामार्गावर अद्याप पाणी असून ते ओसरल्यानंतरच म्हणजेच उद्या, सोमवारपासून महामार्ग खुला करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.
महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहतूक करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी पाण्याचा टँकर पोकलेनसह पाठवून घेतली. टँकर पाण्याचा रस्ता पार करून गेला; मात्र पाण्याला वेग वाहतूक सुरक्षीत नसल्याचे जाणवले. त्यामुळे महामार्गावरून अवजड वाहतूकही होणार नाही. त्यामुळे कोल्हापुरात जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा आपत्कालीनच्या बोट मधूनच केला जाणार आहे.