“उद्धवा अजब तुझे सरकार”; कोरेगाव भीमाच्या मुद्यावरून किरीट सोमय्यांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:57 IST2020-02-14T15:56:06+5:302020-02-14T15:57:44+5:30
माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले होते.

“उद्धवा अजब तुझे सरकार”; कोरेगाव भीमाच्या मुद्यावरून किरीट सोमय्यांची सरकारवर टीका
मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे वर्ग करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. तसेच, माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले होते. यावरूनच भाजपने आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर "उद्धवा अजब तुझे सरकार" असा खोचक टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगवाला आहे.
सोमय्या यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 22 डिसेंबरला सांगतात एसआयटीमार्फत चौकशी करावी. त्यांनतर 23 जानेवारीला याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांना निर्देश देतात. तर लगेच 24 जानेवारीला शरद पवार मुख्यमंत्री यांना पत्र पाठवतात. पवारांनी पत्र पाठवताच दुसऱ्या दिवशी 25 जानेवारीला एनआयए हा तपासा स्वता:कडे घेण्याचा प्रयत्न करतात.
एनआयएकडे तपास वर्ग होत असल्याने 27 जानेवारीला राज्य सरकार कडाडून याला विरोध करतात. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यांनतर आता 13 फेबुवारीला महराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सांगतात की मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहे की, हे तपास आता एनआयएकडे वर्ग करण्यात यावे. त्यामुळे "उद्धवा अजब तुझे सरकार” असे म्हणत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.