"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:53 IST2025-06-27T13:52:12+5:302025-06-27T13:53:32+5:30
Sharad Pawar: पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत
महाराष्ट्रामध्ये शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. तसेच राज्य सरकारकडून हिंदी भाषेच्या होत असलेल्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची हिंदी भाषेच्या सक्तीबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे. पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध आणि हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, या प्रश्नाला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणे योग्य नाही. पण पाचवीनंतर आपण हिंदी भाषा अनिवार्य करू शकतो. भारतात ५० टक्के नागरिक हिंदीत बोलतात. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.
तर ठाकरे बंधूंकडून होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याबाबत शरद पवार म्हणाले की, कोणीही सांगतो म्हणून आंदोलनात सहभागी होता येणार नाही. मुंबईत गेल्यावर मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ऐकून घेईन. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.