मंडणगड : राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री दावोस येथे परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले असताना पालकमंत्री पदाबाबत प्रश्न निर्माण करून मिळालेल्या यशाला गालबोट लावण्याचे कृत्य अनाकलनीय आहे. हे महायुतीच्या शासनाला शोभनीय नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड येथे व्यक्त केले.मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी नागरी सत्कार सोहळ्यानंतर भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, परस्पर समन्वय राखून पालकमंत्रिपदासह सर्व विषयांवरील समस्यांचे समाधान शोधले जाईल, असे ते म्हणाले. आंबडवे गावाचे आदर्श संसद ग्राम योजनेसंदर्भात विशेष बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच मंडणगड तालुक्यातील पर्यटन, जलमार्ग, दळणवळण यांबाबत विशेष मंडणगड पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याबाबतच्या नागरिकांच्या सूचना व प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन यावेळी केले. बाणकोट बागमांडला या ठिकाणी जुना पूल पाडून त्याच बाजूला ठिकाणी नव्याने साकारत असलेल्या सागरी सेतूचे बांधकाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याचे स्पष्ट संकेत दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, संदीप राजपुरे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, भाई पोस्टुरे, अजय बिरवटकर, स. तु. कदम, रमेश दळवी, लुकमान चिखलकर, साधना बोथरे, प्रतीक आंबरे, नेहा जाधव, वैभव कोकाटे, सोनल बेर्डे, रेश्मा मर्चंडे उपस्थित होते.जिल्हा निर्मितीबाबत कुठलाही प्रस्ताव नाहीसमाजमाध्यमावर मंडणगड जिल्ह्यांच्या निर्मितीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारले. त्यावर ते म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित झालेला नाही. या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. नव्याने जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असणारे निकष व या शासनाचा अग्रक्रम यानुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले.
महायुतीसाठी 'हे' अशोभनीय, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:22 IST