Sanjay Raut News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यापूर्वीच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढवित आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राज्यासह राष्ट्रीय पातळीवरही उत्सुकता लागून राहिली आहे. राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालीच तर महाविकास आघाडी टिकणार की फुटणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. यातच काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
आमचा संवाद चांगला आहे, आमची चर्चा झालेली आहे.
ठाकरे बंधू एकत्र आले, तर आम्हाला काही हरकत नाही, असे काँग्रेस नेते म्हणत आहेत, याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. यावर बोलताना, मला माहिती नाही. ही नवीन माहिती आम्हाला तुम्ही देत नाही. आमची सविस्तर चर्चा होत असते. झालेली आहे. काँग्रेस नेते आणि आम्ही एकमेकांना अनेकदा भेटत असतो. आमचा संवाद चांगला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्या दोघांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही. ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरेंबद्दल अद्याप निर्णय नाही. राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की, चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल.