दुबईमध्ये अडकलेल्या १,२०० हून अधिक मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; ५०० जण सुखरूप मायदेशी परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:18 IST2026-03-07T19:01:08+5:302026-03-07T19:18:13+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुबई येथील भारतीय कॉन्सुल जनरल तसेच IPF MahaHelpline च्या व्यवस्थापन पथकाशी सातत्याने संपर्कात आहेत.

दुबईमध्ये अडकलेल्या १,२०० हून अधिक मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; ५०० जण सुखरूप मायदेशी परतले
मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिका इस्त्रायल या दोन देशांनी इराणवर हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यात इराणचे प्रमुख खामेनेई यांच्यासह अन्य काही प्रमुख अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इराणनेही प्रत्युत्तर देत शेजारील देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. दुबईमध्येही हल्ले झाले. दुबईमध्ये मोठ्या प्रमणात भारतीय राहतात. दुबईमधील भारतीयांना मदतीसाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारनेही प्रयत्न सुरू केले आहेत. दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी प्रवासी व समुदायाला मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली IPF MahaHelpline ही सेवा पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन म्हणून सक्रिय करण्यात आली आहे.
ही हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर एका दिवसात १,२०० हून अधिक प्रभावित प्रवाशांकडून मदतीच्या विनंत्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती दुबई येथून या उपक्रमाचे नेतृत्व करणारे राहुल तुळपुळे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने सुरू असलेली IPF MahaHelpline (+971 50 365 4357) ही सेवा दुबईमधील पाच शहरांमध्ये कार्यरत असलेल्या २० हून अधिक स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे २४ तास चालवली जात आहे. अडकलेल्या प्रवाशांना हॉटेल मुक्काम वाढविणे, अन्न व औषधे उपलब्ध करून देणे, तात्पुरती निवासव्यवस्था, वाहतूक सुविधा तसेच दूतावासाशी समन्वय अशा विविध प्रकारची मदत केली जात आहे.
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 2, 2026
याशिवाय, स्थानिक डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक प्रिस्क्रिप्शन मिळवून अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय सहाय्य पथकही कार्यरत आहे, ज्यामुळे प्रवाशांचे सुरू असलेले उपचार खंडित होऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे.
भारतीय दूतावासाशीही सातत्याने समन्वय
हेल्पलाईनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाशीही सातत्याने समन्वय साधत आहे. भारतीय राजदूत आणि कॉन्सुल जनरल यांच्याकडून नियमित माहिती घेतली जात असून, पडताळणी केलेले अद्ययावत अपडेट्स प्रभावित प्रवाशांपर्यंत व्यावसायिक पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅप समन्वय गटामार्फत पोहोचवले जात आहेत.
२ ते ६ मार्च या कालावधीत दुबईतील विविध विमानतळांवरून तसेच ओमानमधील मस्कत येथून उपलब्ध उड्डाणांद्वारे ५०० हून अधिक प्रवासी सुखरूप भारतात परतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दुबई येथील भारतीय कॉन्सुल जनरल तसेच IPF MahaHelpline च्या व्यवस्थापन पथकाशी सातत्याने संपर्कात असून, या प्रदेशात अडकलेल्या प्रवाशांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हेल्पलाईनचे वाहतूक समन्वयक प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुजैराह आणि मस्कतसारख्या पर्यायी प्रस्थान केंद्रांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच नीलम नांदेडकर आणि श्वेता करंदीकर यांच्या नेतृत्वाखालील प्राधान्य सहाय्य पथक लहान मुले, अर्भके आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना विशेष मदत पुरवत आहे.
दरम्यान, भूषण चौधरी आणि प्रसाद दातार हे डेटा व्यवस्थापन, हेल्पलाईनचे दैनंदिन कामकाज आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सचे व्यवस्थापन पाहत असून, अडकलेले प्रवासी आणि स्वयंसेवकांच्या नेटवर्कमध्ये सुरळीत समन्वय राखण्याचे काम करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, अडकलेल्या मराठी प्रवाशांना मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.
प्रवाशांना मायदेशी परत पाठवण्यासाठी हेल्पलाईनचे पथक
हवाई क्षेत्रातील अडथळ्यांमुळे IndiGo, SpiceJet आणि Air India या भारतीय विमान कंपन्यांची अनेक उड्डाणे रद्द झाल्यानंतर, राहुल तुळपुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ४०० हून अधिक प्रभावित प्रवाशांची यादी तयार केली आहे.
ही यादी कॉन्सुलेटमार्फत संबंधित विमान कंपन्यांना पाठविण्यात आली असून, उपलब्ध आसने आणि उड्डाणांच्या स्लॉटमध्ये या प्रवाशांना प्राधान्य देऊन त्यांचे लवकरात लवकर भारतात पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
उड्डाणांची संख्या हळूहळू वाढत असल्याने, पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त प्रवाशांना मायदेशी परत पाठवण्यासाठी हेल्पलाईनचे पथक महाराष्ट्र शासन, दुबईतील भारतीय कॉन्सुल जनरल कार्यालय, विमान कंपन्या आणि चार्टर ऑपरेटर्स यांच्यासोबत जवळून काम करत आहे, अशी माहिती राहुल तुळपुळे यांनी दिली.